रेल्वे अपघातात गंभीर जखमी होऊन बेशुद्ध अवस्थेत गेलेल्या २३ वर्षीय तेजश्री वैद्यला अखेर ५ महिन्यांनंतर डिस्चार्ज मिळाला आहे. तेजश्रीवर गेल्या पाच महिन्यांपासून सायन आणि रहेजा या रुग्णालयात उपचार सुरू होते. १९ एप्रिलला परिक्षेचा शेवटचा पेपर लिहिण्यासाठी म्हणून तेजश्री सीएसएमटीच्या दिशेने जात होती. त्यावेळी दरवाजावर उभी असताना तिचा तोल जाऊन ती मध्य रेल्वेच्या सायन आणि माटुंगा या रेल्वे स्थानकांदरम्यान नाल्यात पडली. या अपघातात तेजश्रीच्या मेंदूला जबर दुःखापत झाली होती. गेले पाच महिने तेजश्री सायन आणि नंतर रहेजा रुग्णालयात उपचार घेत होती. अखेर तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं आता पाहायला मिळत आहे. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच १३ सप्टेंबर या दिवशी तिला डिस्चार्ज देण्यात आला.
तिच्या मेंदूची जखम गंभीर होती. जबर धक्क्यामुळे तिचा मेंदू वेगाने जागेवरून हलला होता. पण, आता ती हळूहळू बरी होतेय. उपचारांना प्रतिसाद देत आहे आणि तिच्या अंगठ्याला ही दुखापत झाली होती. त्या अंगठ्याचीही ती आता हालचाल करू शकते.
डॉ. कौस्तुभ महाजन, सल्लागार न्यूरोलॉजिस्ट, एसएल रहेजा हॉस्पिटल
तेजश्रीला ८ लाखांची मदत
जुलै महिन्यात तेजश्रीच्या कुटुंबियांनी रेल्वेकडे आर्थिक मदतीसाठी पत्रव्यवहार केला होता. मात्र, रेल्वेकडून कोणतेही आर्थिक सहाय्य या कुटुंबाला मिळाले नाही. त्यानंतर वेगवेगळ्या माध्यमांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात समाजाच्या विविध स्तरातून मदतीचा ओघ सुरु झाला. या सगळ्यामध्ये तेजश्रीचे वडील, कुटुंब यांना प्रचंड मानसिक त्रासातून जावं लागलं होतं. मात्र, तेजश्रीला बरं करण्याच्या इच्छाशक्तीला अखेर यश मिळालं आहे.
गेले कित्येक महिने तेजश्री व्हेंटिलेटवर होती. पण, आता ती घरी आली आहे. तिची प्रकृती ठीक आहे. पण, अजूनही ती बोलत नाही. ती पूर्णपणे शुद्धीवर आलेली नाही. नाकात नळी असल्यामुळे तिला सध्या पातळ पदार्थ खावे लागत आहेत. आता हळूहळू ती डाव्या हाताची हालचाल करतेय. डाव्या पायाला जास्त मार बसल्यामुळे त्या पायाची ती हालचाल करु शकत नाहीये.
श्रीराम वैद्य, तेजश्रीचे वडील