वसई विरार परिसरात अनेक भागातील भररस्त्यात बेकायदा आठवडी बाजार भरवून लाखो रुपयांची वसुली केली जात असतानाही वसई-विरार महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने परिसरातील नागरिकांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. नालासोपाऱ्यातील अशाच एका बाजारांमुळे परिसरातील रहिवाशी आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाबाबत समाजसेवक तसेच परिसरातील १० सोसायटींनी केलेल्या तक्रारींना मात्र महापालिकेने कराची टोपली दाखवली आहे. नालासोपारा पूर्व परिसरातील ओस्वाल नगरीपासून प्रगती नगरपर्यंत मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसवण्यात आलेले आहेत. त्या बदल्यात काही व्यक्ती या फेरीवाल्यांकडून प्रतिदिन ठराविक पैसे घेत असल्याच्या तक्रारी आहेत. फेरीवाल्यांमुळे संध्याकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. ही बाब या परिसरातील समाजसेवक दीपक वोरा यांनी वसई-विरार महापालिका प्रभाग ‘ब’च्या सहाय्यक आयुक्त धनश्री शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिली होती. याशिवाय परिसरातील १० सोसायटीतील रहिवाशांनीही याबाबत शिंदे यांच्याकडे तक्रारी केलेल्या होत्या. मात्र या तक्रारींकडेही धनश्री शिंदे यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दीपक वोरा यांचे म्हणणे आहे.
वसई-विरार परिसरात सध्या मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारांचे पेव फुटले आहे. यातून काही लोक लाखो रुपये वसूल करत आहेत. ओस्वाल नगरी ते प्रगती नगरपर्यंत फेरीवाले बसवण्याकरता पालिकेने परवानगी दिली आहे का?, याबाबत महापालिकेच्या प्रभाग ‘ब’च्या सहाय्यक आयुक्तांकडे विचारणा केली होती. मात्र त्यांनी याबाबत काहीच उत्तर न दिल्याने आता माहिती अधिकारात याबाबत उत्तर मागितले आहे.
– दीपक वोरा, समाजसेवक
विशेष म्हणजे ओस्वाल नगरी परिसरात नागरिकांची अडवणूक करून याच ‘बाजार बुणग्या’कडून दर रविवारी बेकायदा आठवडी बाजार भरवण्यात येत आहे. या बाजारातून प्रतिदिन लाखो रुपयांची वसुली केली जात असल्याचेही परिसरातील रहिवाशांचे म्हणणे आहे. या आठवडी बाजारात ४०० फेरीवाले बसतात. त्यांच्याकडून प्रती दुकान ३५० रुपयांपर्यंत पैसे आकारले जात असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. दुकानदारांची लूट करण्यासोबतच या बाजारांतून अन्य गैर धंद्यांना ऊत येत असल्याचीही या परिसरातील नागरिकांची तक्रार आहे. कोविड प्रादुर्भाव काळातही या परिसरातील बाजार बिनदिक्कत खुले होते, असे वोरा यांचे म्हणणे आहे.
फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या बाबतीतील धोरण ठरवत आहोत. ते कशा पद्धतीने कार्यन्वित करता येईल, याबाबत विचार विनिमय सुरु आहे. ओस्वाल नगरीतील तक्रारीबाबत संबंधित विभागाच्या उपायुक्त यांच्याकडून माहिती घेतली जाईल. त्यानंतर कारवाईचा एक्शन प्लान बनवला जाईल.
– अनिलकुमार पवार, आयुक्त
अद्याप जिल्हाधिकाऱ्यांनी कोविड प्रतिबंधक नियमात शिथिलता दिलेली नाही. काही आस्थापने आणि लग्न समारंभ यांना अटी-शर्थी लागू आहेत. असे असताना महापालिका आयुक्तांनी कोणत्या निकषावर आठवडी बाजार सुरु करण्यास मुभा दिली?, याचा खुलासा करावा, अशी मागणी वोरा यांनी केली आहे. दरम्यान, अशाच प्रकारचे अनेक दररोज आणि आठवडी बाजार वसई विरार परिसरातील अनेक भागात भरवले जात आहेत. खासगी मोकळ्या जागेत दररोज पहाटेपासून रात्रीपर्यंत बाजार भरलेले असतात. या बेकायदा बाजारांमुळे महापालिकेचा महसूलही बुडत आहे. पण, त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.