आयपीएल २०२२ च्या हंगामाला मार्च-एप्रिल महिन्यांपासून सुरूवात होण्याची शक्यता आहे. परंतु आता आयपीएलसाठी मेगा ऑक्शनच्या तयारीला मोठ्या प्रमाणात सुरूवात झाली आहे. कारण आयपीएलसाठी मेगा ऑक्शन येत्या १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरूमध्ये होणार आहे. तसेच यंदाच्या हंगामात दोन नवीन टीमचं देखील स्वागत केलं जाणार आहे. त्यामुळे यावेळी ८ नाहीतर एकूण १० टीम या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. ऑक्शनपूर्वीच ३३ खेळाडूंना सर्व टीमनी मिळून करारबद्ध केले आहे. मात्र, बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
BCCI आंतरराष्ट्रीय मालिकेत बदल करण्याची शक्यता
टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवसीय सामना १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. परंतु आयपीएल मेगा ऑक्शनच्या पार्श्वभूमीवर या सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. कारण बीसीसीआय या विषयावर वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे. नियोजित वेळापत्रकानुसार अहमदाबाद, जयपूर, कोलकाता, कटक, विशाखापट्टणम आणि तिरूअनंतपुरममध्ये या मालिकेसाठी सामने होणार आहेत. ६ फेब्रुवारी ते २० फेब्रवारी दरम्यान या मालिका खेळवण्यात येणार आहेत. परंतु कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे सामने अहमदाबाद आणि कोलकाता या दोन नवीन शहरांत घेण्याचा निर्णय बीसीसीआयच्या टूर्स अँड फिक्सचर समितीकडून केला जाऊ शकतो.
श्रीलंका टीम भारत दौऱ्यावर
फेब्रवारी आणि मार्च महिन्यात श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. या दोन्ही संघामध्ये ३ कसोटी आणि ३ टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. परंतु श्रीलंका सीरिजमध्ये देखील बदल होण्याची शक्यता आहे. हे सामने मोहाली आणि लखनऊमध्ये होणार होते. परंतु आता हे सामने नियोजित वेळापत्रकानुसार बंगळुरू आणि मोहालीमध्ये होणार असल्याचं सांगितलं जातंय. त्याचप्रमाणे टी-२० सामने धर्मशालामध्ये होण्याची शक्यता आहे.
कसोटी मालिकेत टीम इंडियाची धुरा कोण सांभाळणार?
दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला. विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. त्यामुळे श्रीलंका विरूद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाची धुरा कोणता खेळाडू सांभाळणार हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाच्या कर्णधारपदासाठी रोहित शर्मा, केएल राहुल आणि ऋषभ पंत ही नावं सध्या चर्चेत आहेत. मात्र, सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून रोहित शर्माचं नाव आघाडीवर आहे.