मुंबई : मुंबईत अथक प्रयत्नांनी कोविडच्या तीन लाटा रोखण्यात पालिका आरोग्य यंत्रणेला यश आले आहे. मात्र आता मुंबईत कोविडची चौथी लाट येऊ नये, यासाठी पालिका यंत्रणा अलर्ट झाली आहे. पाच राज्यातील निवडणुका संपल्या असून तेथून मुंबईत परतणाऱ्या व्यक्तींवर आणि त्यांच्या मुंबईतील बंद घरांवर पालिका आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे. मुंबईत बाहेरून येणाऱ्या व्यक्तींमध्ये कोविडबाबत काही लक्षणे आढळून आल्यास त्याची गंभीर दखल घेऊन त्यावर तात्काळ उपचार करण्यात येणार आहेत. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा कोविडचा संसर्ग वाढून पालिकेची डोकेदुखी वाढणार नाही.
मुंबईत मार्च २०२० पासून कोविडचा प्रादुर्भाव वाढीस लागला होता. त्यामुळे कोविडची पहिली लाट आली होती. त्यानंतर शासन व पालिका प्रशासनाला काही कडक निर्बंध घालावे लागले होते. असाच काहीसा प्रकार कोविडच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेप्रसंगी झाला होता. कोविडची तिसरी लाट पालिका आरोग्य यंत्रणेने यशस्वीरित्या परतावून लावली. सध्या मुंबईत कोविड रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने कोविड संसर्ग नियंत्रणात आहे.
मात्र गोवा, पंजाब, उत्तर प्रदेश आदी पाच राज्यातील निवडणुकिंचा निकाल जाहीर झाला असून मुंबईत स्थायिक अनेकजण आता मुंबईत परतत आहेत. मात्र त्यांच्या माध्यमातून चुकूनही मुंबईत कोविडचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी पालिका यंत्रणा डोळ्यात तेल टाकून वॉच ठेवत आहे. तसेच, जे जे लोक सदर निवडणुकीच्या प्रसंगी मुंबईतील घर बंद करून परराज्यात गेले होते, त्या त्या बंद घरांवर पालिका आरोग्य यंत्रणेच्या कर्मचार्यांकडून वॉच ठेवण्यात येत आहे.