घरमहाराष्ट्रविनायक मेटे यांच्या मृत्यूमागे घातपात? मराठा क्रांती ठोक मोर्चाचा संशय

विनायक मेटे यांच्या मृत्यूमागे घातपात? मराठा क्रांती ठोक मोर्चाचा संशय

Subscribe

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांचे आज पहाटे अपघाती निधन झाले. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर अपघात झाल्यानंतर वेळेवर मदत मिळाली नसल्याचा आरोप केला जात आहे. त्यावरूनच मराठा क्रांती ठोक मोर्चाने या घटनेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मराठा समन्वय समितीची मुंबईत बैठक होती. त्या बैठकीसाठी ते बीडहून येत असताना खालापूर टोलनाका येथे त्यांच्या गाडीचा अपघात झाला. अचानक ट्रकमध्ये आल्याने वेगात असलेली गाडी गाडीवर नियंत्रण ठेवणे मेटे यांच्या गाडीच्या चालकाला शक्य झाले नाही. त्यांची गाडी ट्रकच्या उजव्या बाजूला धडकली. झोपेत असलेल्या मेटे यांच्या डोक्याला मार बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

- Advertisement -

गाडीचा अपघात झाल्यानतंर जवळपास तासभर कोणतीही मदत मिळाली नाही, असा दावा मेटे यांच्या गाडीचा चालक एकनाथ कदम यांनी केला आहे. मात्र दुसरीकडे पोलिसांनी हा दावा फेटाळून लावताना, अपघाताची माहिती मिळताच पुढील काही मिनिटांतच आम्ही घटनास्थळी दाखल झालो होतो, असे म्हटले आहे. त्यातच रुग्णवाहिका विलंबाने पोहोचणे तसेच आजूबाजूच्या कुणीही मदत न करणे या घटनांवरून देखील हा अपघात की घातपात, असा संशय व्यक्त केला जात आहे.

आम्ही माहिती घेतली त्यानुसार अपघातानंतर जवळपास दोन तास रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली नव्हती. आजूबाजूला मदतीसाठी देखील कुणी थांबले नाही. हा अपघात होता की घातपात होता? याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी, असे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आणि मराठा समन्वयक बाळासाहेब खैरे पाटील म्हणाले. मराठा आरक्षणासाठी अजून सरकार किती बळी घेणार आहे? असा सवालही त्यांनी केला. या सर्व आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घटनेच्या चौकशीचे आदेश दिला आहे.

- Advertisement -

उद्या बीडमध्ये अंत्यसंस्कार
बीड ही विनायक मेटे यांची कर्मभूमी होती. तिथे मेटे यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या समर्थकांनी शिवसंग्राम भवनावर गर्दी केली. कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी विनायक मेटे यांचे पार्थिव आज एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईहून बीडला नेण्यात येणार आहे. तिथेच उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती शिवसंग्रामचे मुंबई अध्यक्ष राजन घाग यांनी दिली.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -