घरमहाराष्ट्रमल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, एच. के. पाटील यांना विश्वास

मल्लिकार्जुन खर्गेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा उभारी घेईल, एच. के. पाटील यांना विश्वास

Subscribe

मुंबई : काँग्रेस सर्वांना संधी देणारा पक्ष असून एका सामान्य कुटुंबातील व्यक्तीला राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडून देऊन या पक्षाने एक इतिहास घडवला आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे अनुभवी, कुशल प्रशासक व सामान्य जनतेच्या कल्याणासाठी झटणारे नेते आहेत. त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाखाली काँग्रेस देशात पुन्हा एकदा उभारी घेईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी व्यक्त केला.

एच. के. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली टिळक भवन येथे प्रदेश काँग्रेस समितीच्या विस्तारीत कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अभिनंदनाचा ठराव नाना पटोले यांनी मांडला व त्याला विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुमोदन दिले.

- Advertisement -

या बैठकीला विधिमंडळ अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा नेटा डिसुझा, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष खा. इम्रान प्रतापगढी, माजी मंत्री यशोमती ठाकूर, वर्षा गायकवाड, माजी राज्यमंत्री बंटी पाटील, डॉ. विश्वजित कदम, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते.

घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना चोख उत्तर – पटोले
काँग्रेस हा लोकशाही मानणारा पक्ष आहे, मल्लिकार्जुन खर्गे यांची लोकशाही पद्धतीने निवडणूक होऊन अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक कामगार कुटुंबातील व्यक्ती देशातील सर्वात जुन्या पक्षाचा अध्यक्ष होतो ही ऐतिहासिक घटना आहे. काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांना हे चोख उत्तर आहे, असे नाना पटोले यांनी यावेळी सांगितले. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद स्वीकारावे, असा विनंती प्रस्ताव महाराष्ट्रासह इतर प्रदेश काँग्रेस कमिटींनीही केला होता; पण त्यांनी तो नाकारून पक्षातीलच इतर व्यक्तीने अध्यक्षपदाची जबाबदारी घ्यावी अशी भूमिका घेतली होती, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पक्षाला पुन्हा अच्छे दिन येतील – थोरात
आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेता, प्रदेशाध्यक्ष अशा विविध पदांवर मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या कामाची छाप सोडली आहे. 50 वर्षांचा ससंदीय कार्याचा प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. काँग्रेस पक्षाचा ब्लॉक अध्यक्ष ते राष्ट्रीय अध्यक्ष असा त्यांचा राजकीय प्रवास आहे. खर्गे यांच्या नेतृत्वाखाली व सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाला पुन्हा चांगले दिवस येतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

खर्गेंच्या निवडीचा फायदा महाराष्ट्रालाही – अशोक चव्हाण
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवडीने पक्षात एक नवचैतन्य निर्माण झाले आहे. खर्गे यांना महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याची बारकाईने माहिती आहे, त्यांच्या अध्यक्षपदाचा फायदा महाराष्ट्रालाही होईल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

भारत जोडो यात्रेची जगाकडून दखल
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ही पदयात्रा यशस्वी करून देशात एक वेगळा संदेश देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या पदयात्रेने देशातील वातावरण बदललेले असून जगानेही भारत जोडो यात्रेची दखल घेतलेली आहे. ही एक ऐतिहासिक पदयात्रा असून केवळ काँग्रेस पक्षाची यात्रा नसून समविचारी पक्षाचे लोक, संघटना यांचाही सहभाग वाढत आहे. लोकशाहीला माननाऱ्या प्रत्येकाचा या पदयात्रेला पाठिंबा आहे. ही पदयात्रा महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला प्रवेश करत असून मोठ्या संख्येने सहभागी होऊन पदयात्रा यशस्वी करण्याचे आवाहन उपस्थित नेत्यांनी केले.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -