मुंबईः मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलंय. न्याय देवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. अनिल देशमुख 1 वर्ष 1 महिना आणि 27 दिवसांनी मुंबईतल्या ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आलेत. त्यानंतर त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलाय.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख जवळपास 14 महिन्यांनी तुरुंगातून बाहेर आलेत. त्यावेळी त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुरुंगाबाहेर जमले होते. विशेष म्हणजे यावेळी त्यांच्या स्वागतासाठी अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे-पाटील हे राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. अनिल देशमुख तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांना पेढे भरवण्यात आले आहेत, तसेच अनिल देशमुखांनी संविधान उंचावून उपस्थितांना साद घातली.
मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलंय. माझ्यावर झालेल्या आरोपांत काही तथ्य नाही, असं निरीक्षण न्यायालयाकडून नोंदवण्यात आलं आहे. न्याय देवतेवर माझा विश्वास आहे. न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय दिला याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो. राष्ट्रवादीचे आमचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीच्या इतर सहकाऱ्यांनी वेळोवेळी जो पाठिंबा दिला आणि सहकार्य केलं, त्याबद्दल मी आभार मानतो, असंही ते म्हणालेत.
Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh is released from Arthur road jail in Mumbai. pic.twitter.com/a3OKktDrq8
— ANI (@ANI) December 28, 2022
कथित १०० कोटी खंडणी वसुलीप्रकरणी गेल्या वर्षभरापासून तुरुंगात असलेले माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख अखेर आज ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर आलेत. त्यांच्या जामिनावरील स्थगितीला मुदतवाढ देण्याची सीबीआयची (CBI) याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याने त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला. विशेष म्हणजे आर्थर रोड तुरुंगातून सुटल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्त्यांकडून सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली काढण्यात आलीय. सीबीआय प्रकरणात पूर्वी आरोपी असलेला सचिन वाझे आता माफीचा साक्षीदार झाला आहे. त्यामुळे त्याच्या साक्षीचे महत्त्व सरकारी पक्षाच्या साक्षीदाराप्रमाणेच राहणार आहे. त्याच्या जबाबावर जामिनाच्या टप्प्यावर अविश्वास दाखवला जाऊ शकत नाही. जामिनाच्या टप्प्यावर लहान खटला चालवून न्यायालय साक्षीदारांच्या जबाबांची विश्वासार्हता तपासू शकत नाही, ते खटल्याच्या सुनावणीतच होऊ शकते. त्यामुळे देशमुखांचा अर्ज फेटाळावा’, असे म्हणणे सीबीआयने प्रतिज्ञापत्रात मांडले होते. परंतु न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळून लावत देशमुखांना सुटकेचा मार्ग प्रशस्त केलाय.
हेही वाचाः वर्षभराने अनिल देशमुख तुरुंगाबाहेर येणार, आर्थर रोड ते सिद्धिविनायक मंदिरापर्यंत बाईक रॅली