घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023आयुक्तालय नाही फक्त आयुक्तांचीच दिल्लीवारी, फडणवीसांची सभागृहात माहिती

आयुक्तालय नाही फक्त आयुक्तांचीच दिल्लीवारी, फडणवीसांची सभागृहात माहिती

Subscribe

Textile Commissioner | मुंबई – मुंबईतील वस्त्रोद्योग आयुक्तालय दिल्लीत हलवण्यात आल्याची माहिती आज राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी आज ट्विटरद्वारे केली होती. वस्त्रद्योग मंत्रालयाचे पत्रच त्यांनी ट्वीट करून खळबळ उडवून दिली होती. याचविषयी आज सभागृहातही मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती मागवली होती. ती माहिती त्यांनी सभागृहासमोर मांडली.

हेही वाचा – “हा महाराष्ट्रद्रोह नाही का?” मुंबईतील वस्त्र आयुक्तालय दिल्लीला हलवल्याने काँग्रेस आक्रमक

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अतिरिक्त सचिवांनी माहिती दिली आहे. मुंबईतील टेक्स्टाइल आयुक्तालय हलवण्याचा निर्णय झालेला नाही. मुंबई कार्यालयात ५००चा स्टाफ आहे. केवळ टेक्स्टाइल आयुक्त आणि पाच अधिकाऱ्यांना दिल्ली मुख्यालयी काही दिवस काम करण्यास सांगितले आहे. टेक्स्टाइल मंत्रालयाची पूर्नबांधणी आणि सक्षमीकरण, तसेच, टेक्स्टाइल उद्योगाला काही सवलतीच्या गोष्टी फ्रेम करण्यासाठी काही दिवस दिल्लीत काम करण्यास सांगितलं आहे.

- Advertisement -

काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी आयुक्तालय दिल्लीला हलवण्यात येणार असल्याचे ट्वीट केले होते. त्यात लिहिले होते की, महाराष्ट्राबद्दलचा पूर्वापार असलेला आकस मोदी सरकार आल्यापासून कृतीत उतरला आहे. IFSCसहित अनेक महत्त्वाचे उद्योग/ प्रकल्प, राष्ट्रीय संस्थांची महत्त्वाची कार्यालये गुजरात वा इतरत्र नेण्यात आली. आता १९४३ पासून मुंबईत असणारे वस्त्र आयुक्त कार्यालय दिल्लीला हलवण्यात येत आहे.

त्यांनी आणखी एक ट्वीट करत कार्यालय हलवण्याच्या मुद्द्यावरून भाजपवर आणि राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत असताना महाराष्ट्रातील भाजपा नेते केंद्राला मदत करतात. हा महाराष्ट्र द्रोह नाही का? महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन आहे. महाराष्ट्राला मागे सारणे हा १२ कोटी मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहेच पण देशासाठीही घातक आहे.” असे ट्वीट करत सावंत यांनी महाराष्ट्रातील भाजपमधील नेते जे करत आहेत, ते महाराष्ट्र द्रोह नाही का?, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे. याबाबतचे ट्वीट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -