मुंबई : केंद्र सरकारतर्फे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांची लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ईडी, सीबीआय, पोलीस आणि प्रसार माध्यमांनंतर या सरकारने आणखी एका संस्थेला आपल्या कवेत घेतले असल्याची टीका त्यांनी केली आहे.
हेही वाचा – Thackeray group : भाजपा हा शेठजींचा पक्ष आणि सावकारी हाच त्यांचा धंदा, ठाकरे गटाची टीका
लोकपालचे पहिले अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पिनाकीचंद्र घोष होते, त्यांनी मार्च 2019पासून हे पद भूषवले आणि मे 2022मध्ये निवृत्त झाले. तर, लोकपालचे विद्यमान अध्यक्ष अजय माणिकराव खानविलकर हे मार्च 2000मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्त झाले होते. त्यांनी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून काम पाहिले आहे. तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती खानविलकर यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या जबलपूरच्या मुख्य खंडपीठात व्यापम घोटाळ्याच्या मॅरेथॉन सुनावणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
ईडी, सीबीआय, पोलिस आणि प्रसारमाध्यमांनंतर या सरकारने आणखी एका संस्थेला आपल्या कवेत घेतलंय आणि ती म्हणजे लोकपाल.
दोन वर्षापासून रिक्त असलेल्या भ्रष्टाचार विरोधी लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश ए एम खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.… https://t.co/KOQxMRegTN
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 28, 2024
खानविलकर यांच्या नियुक्तीबाबत राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. दोन वर्षांपासून रिक्त असलेल्या भ्रष्टाचारविरोधी लोकपालचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या माजी न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांनी वादग्रस्त ‘पीएमएलए’बाबत निकाल दिला होता. ज्यामध्ये ‘ईडी’ला समन्स काढण्याचे आणि अटक करण्याचे बेलगाम आदेश देण्यात आले आहेत. यात आरोपीला मनी लाँड्रिंगप्रकरणी स्वत: निर्दोष सिद्ध करता आले तरच जामीन दिला जाऊ शकतो. या निकालाचं आता मोठ्या खंडपीठाकडून पुनरावलोकन केले जात आहे. पण गेल्या 10 वर्षांचा इतिहास पाहता ‘ईडी’चे छापे कुणावर पडले आहेत आणि त्यांना स्वत:ला निर्दोष सिद्ध करता येईल का, हे तान्हे बाळसुद्धा सांगू शकेल, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – BMC : मुंबई पालिका आयुक्त चहल यांची होणार बदली; गगराणी आणि म्हैसकर यांची नावे चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी जगभर प्रवास करून भारतीय लोकशाहीच्या नावाने ढोल बडवत असतात, पण भारतातील त्यांचे वर्तन हुकूमशाहाप्रमाणेच आहे. सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घ्यायच्या, विरोधकांवर सर्व बाजूंनी दबाव आणून त्यांना गलितगात्र करून सोडायचे, जेलमध्ये टाकायचे आणि सुटकेचे सर्व मार्ग बंद करून टाकायचे, हीच यांची कार्यपद्धती आहे. सर्वकाही लोकांच्या डोळ्यादेखत सुरू आहे, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना जागे कोण करणार, हा खरा प्रश्न आहे, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.
हेही वाचा – Sharad Pawar : पवार घराणे शरद पवारांसोबतच, जितेंद्र आव्हाड यांचा दावा