देशभरातील 13 प्रमुख शहरात शनिवार 1 ऑक्टोबरपासून हाय स्पीड 5G सेवा सुरू होणार आहे. 5G हे तंत्रज्ञान, कोणत्याही व्यत्ययाशिवाय उच्चतम डेटा दरांसह, वाढीव शक्ती, स्पेक्ट्रम आणि नेटवर्क कार्यक्षमतेसह कमीत कमी वेळेत सर्वात विश्वासार्ह संप्रेषण प्रदान करेल. शनिवारी दिल्लीतील प्रगती मैदानावर 4 दिवसीय इंडिया मोबाईल काँग्रेसचा कार्यक्रम सुरू होत आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान मोदी देशात हायस्पीड ५G इंटरनेट सेवा सुरू करणार आहेत.
‘येत्या 2 वर्षात सरकारचे लक्ष्य आहे की, संपूर्ण देशात 5G सेवेची सुविधा पोहोचवली जाणार आहे. यासाठी जवळपास 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. डिजिटल कनेक्टिविटी, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया आणि मेक इन इंडिया कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारचे हे धोरण आहे’, अशी माहिती माहिती व प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
वर्ष 2014 मध्ये 10 कोटी ग्राहकांच्या तुलनेत आज 80 कोटी ग्राहकांकडे ब्रॉडबँड कनेक्शन आहे. 5G तंत्रज्ञान 4G सेवेची गती जवळपास 10 पटीने अधिक आहे.
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने यापूर्वीच देशात 4 ठिकाणी 5G च्या यशस्वी चाचण्या केल्या आहेत. या 4 ठिकाणांमध्ये दिल्लीचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, बंगळुरूचे मेट्रो, कांडला बंदर आणि भोपाळचे स्मार्ट सिटी क्षेत्राचा समावेश आहे.
या १३ शहरात सुरू होणार 5G सेवा
पहिल्या टप्प्यात देशातील 13 मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा सुरू केली जाणार आहे. यामध्ये दिल्ली, मुंबई, अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगड, चेन्नई, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, कोलकाता, जामनगर, लखनऊ, पुणे या शहरांचा समावेश आहे. दोन वर्षांनंतर संपूर्ण देशभरात ही सेवा पुरवली जाणार आहे.
हेही वाचा – पुण्यात ‘मुसळधार’, झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू