बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र, मुंबई विद्यापीठ, सार्थ प्रतिष्ठाण आणि मुंबई न्यूज फोटोग्राफी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शन फोर्टच्या सर कावसजी जहांगीर दीक्षांत सभागृहात करण्यात आले आहे. या फोटो प्रदर्शनावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी फोटो प्रदर्शनाला भेट दिली. तसेच त्यांनी मीडियाशी संवाद साधला.
बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची मैत्री ही तेव्हापासून आणि वर्षानुवर्षे होती. मला असं वाटतं की, आज महाविकास आघाडीचे सरकार झाले आहे, एक युती झाली आहे. तसेच आता मैत्री झाली असल्यामुळे ती बघायला मोठे साहेब इथे हवे होते, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
बाळासाहेबांसोबत मी राहिलो असल्यामुळे मला राजकारणात रस होता. मी त्यांच्या दौऱ्याला जात असे. एक क्षण असा होता की, एक निवडणूक जिंकलो होतो. चौथ्या दिवशी माझी परीक्षा होती. मी आईला न सांगताच वडिलांसोबत दौऱ्याला निघून गेलो, ही आठवण देखील आदित्य ठाकरेंनी सांगितली.
महाजन असतील, मुंडे साहेब असतील. त्यावेळचे राजकारण खूप वेगळे होते. राजकीय स्टेजवरून टीका आणि आरोप-प्रत्यारोप व्हायचे. पण पातळी सोडून कुणी खाली गेले नाही. ते मैत्री विसरले नाहीत. त्यांच्यावर कधीही खोटे गुन्हे दाखल झाले नाहीत, असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी भाजपला लगावला.
शिवसेनेच्या या निर्णयावर भाजपकडून सातत्याने टीका होत आहे. मोदींच्या जीवावर तुमचे आमदार निवडून आले आहेत. तुम्ही आमच्या पाठित खंजीर खुपसून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केल्याचा आरोपही भाजपकडून करण्यात आला. लग्न आमच्याशी लावलं आणि पळून दुसऱ्यासोबत गेलात, अशी हिनवणीही भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे.
हेही वाचा : महिला पोलिसाला धक्का लागल्याचं एक जरी फुटेज समोर आलं तर मी राजकारण सोडेन : संदीप देशपांडे