ओडिशातील (Odisha) बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी (2 जून) संध्याकाळीत साडेसातच्या सुमारास तीन ट्रेनचा भीषण अपघात झाला होता. या अपघातात आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 900 प्रवासी जखमी झाल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे. भारतातील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, यामध्ये काही निष्पाप लोकांचे जीव गेलेत त्यामुळे यामध्ये रेल्वे विभागाचं आणि सरकारचं अपयश आहे. रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली.
रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा
अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, आतापर्यंत मोठ्या अपघातांची जबाबदारी स्वीकारून पाच रेल्वेमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. तसेच या प्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्यांनी राजीनामा दिला पाहीजे. राजीनामा देऊन प्रश्न सुटणार नाही. कारण खालच्या अधिकाऱ्यांची देखील जबाबदारी वाढते. यामध्ये सिग्नलची व्यवस्था, बुलेट ट्रेन विविध भागांत सुरू करणार असल्याचं म्हटलं जातंय. गोवा ते मुंबई आज वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होणार होती. परंतु या दुर्घटनेमुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. काही ठिकाणी रेल्वेच्या मार्गांचं खासगीकरण देखील करण्यात आलंय. कारण तो केंद्र सरकार आणि रेल्वे विभागाचा अधिकार आहे, असं अजित पवार म्हणाले.
वस्तूस्थिती जनतेच्या समोर आली पाहिजे
एवढे निष्पाप लोकं मृत्यूमुखी पडले. त्यांचा काय दोष आहे. सिग्नलचा बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. एवढी मोठी क्रांती झाली आहे. काही ठिकाणी विमान आणि कार चालवण्यासाठी ड्रायव्हरची सुद्धा गरज नसते. परंतु काही निष्पाप जीव गेलेत त्यामध्ये रेल्वे विभागाचं आणि सरकारचं मोठं अपयश आहे. या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून वस्तूस्थिती देशाच्या आणि जनतेच्या समोर आली पाहिजे, ही माझी मागणी आहे, असंही अजित पवार म्हणाले.
पुरेसा प्रतिसाद आम्हाला विदर्भातून मिळत नाही
ज्याप्रकारे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र किंवा मराठवाडा असेल जळगावमध्ये सहा जागा निवडून आल्या होत्या आणि आता नगरमधून सहा जागा निवडून आल्या आहेत. पुण्यातून दहा जागा निवडून आल्या आहेत. अशा अनेक जिल्ह्यातून अनेक जागा निवडून येतात. परंतु तेवढा पुरेसा प्रतिसाद आम्हाला विदर्भातून मिळत नाही, असं पवार म्हणाले.
आमच्या येथील स्थानिक कार्यकर्त्यांनी सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्यामध्ये नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, तालुका पंचायत यामध्ये चांगल्याप्रकारे यश मिळालं तर आम्ही ती जागा मागवू शकतो. पूर्वी आम्ही काँग्रेससोबत बसायचो आणि आता मविआ असल्यामुळे तिन्ही पक्ष एकत्र बसतात आणि त्यामध्ये चर्चा करतात. पण आम्ही लोकं यामध्ये निर्विवाद कमी पडलो हे सुद्धा सत्य आहे. नागपुरात २ दिवसांचं चिंतन शिबीर घेण्यात आलंय. तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अनेक दौरे वाढवले जातील, असंही पवार म्हणाले.
हेही वाचा : Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघातात 288 लोकांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता