मुंबई – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी काल सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यावर दावा केला होता. आज त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील गावाबाबत वक्तव्य केलं आहे. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, अशा शेलक्या शब्दांत माजी उपमुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी टीका केली आहे. (Ajit Pawar on Maharashtra Karnatak Border Conflict)
हेही वाचा – उद्योग-गावं पळवली, सरकार देवधर्म, तंत्र-मंत्र, ज्योतिषीमध्ये अडकले; संजय राऊतांचा घणाघात
महाराष्ट्र असातसा वाटला का तुम्हाला? आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट गावबाबत वक्तव्य केलं. काहीही संबंध नसताना अशाप्रकारचे वक्तव्ये करून लोकांचं लक्ष विचलीत करण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याबाबत कडक भाषेत प्रत्युत्तर दिलं पाहिजे. याआधी अशी वक्तव्ये होत नव्हती. महाराष्ट्राची मुंबईच मागायची राहिली आहे की काय कळत नाही, असं अजित पवार म्हणाले.
तुम्ही महाराष्ट्र मागायला निघालात का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र असा- तसा वाटला का? असा रोखठोक आणि संतप्त सवाल राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची आज प्रदेश कार्यालयात आदरणीय शरद पवार यांच्या उपस्थितीत बैठक होत असून या बैठकीला आले असता अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
हेही वाचा – केंद्राच्या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या आदित्य ठाकरेंचा खरा चेहरा समोर, नितेश राणेंची टीका
लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्य केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले आहे काय माहित. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कडक शब्दात त्यांना सुनावले पाहिजे. आता फक्त मुंबई मागणे बाकी ठेवले आहे, असा उपरोधिक टोलाही अजित पवार यांनी यावेळी लगावला.
केंद्राने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही असा इशाराही अजित पवार यांनी दिला. प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले आहे. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.
हेही वाचा – भारत जोडो यात्रेचे सीमोल्लंघन होताच, काँग्रेसकडून सावरकर वादाला पूर्णविराम
आम्ही शिर्डी येथे गेलो. पंढरपूर येथे गेलो तर दर्शन घेतो. आपली ती परंपरा आहे. तिथपर्यंत समजू शकतो मात्र ज्योतिषाकडे जाऊन आपले भविष्य बघणे कितपत योग्य आहे. २१ व्या शतकात जग कुठे चालले आहे. बदल होत असताना सायन्स काय सांगत आहे. पुरोगामी राज्याचे मुख्यमंत्री ज्योतिष बघतात… काय बोलावं आम्ही हतबल झालो ऐकून अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली.