पेण : लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे. उमेदवार जाहीर झालेत प्रचार जोरात सुरू आहे. अशातच पेण तालुक्यातील बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी मोठा निर्णय घेऊन निवडणूक आयोगासह सरकारला संकटात टाकले आहे. बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय एकमताने घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे तसेच ठाकरे गटाचे उमेदवार अनंत गीते यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात 13 वर्षांपूर्वी बाळगंगा धरण प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली. यात जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे आणि वाशिवली या एकूण 6 ग्रामपंचायती हद्दीतील 9 महसुली गावे आणि 13 आदिवासी वाड्यांमधील जवळपास 3 हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाले आहेत. त्यांच्या पुनर्वसनाची सरकारची जबाबदारी आहे. प्रत्यक्षात धरणाचे काम 80 टक्के पूर्ण झाले तरीही धरणग्रस्तांचे अजिबात पुनर्वसन झालेले नाही. त्यामुळे संतप्त बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांनी लोकसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
हेही वाचा… Alibaug Raigad Crime : विवाहबाह्य संबंधांसाठी आईकडूनच दोन चिमुरड्यांची हत्या
प्रकल्पग्रस्तांच्या संघर्ष समितीने वरसई येथील वैजनाथ मंदिरात काल (9 एप्रिल) बैठक घेतली. ही बैठक वादळी ठरली. या बैठकीत लोकसभेसह विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत आदी सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवाय येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याच उमेदवाराला मतदान न करण्याचे सर्वानुमते ठरले. जोपर्यंत बाळगंगाचे प्रलंबित प्रश्न, जमिनीचा मोबदला, पुनर्वसनासाठी प्लॉटचे वाटप, घरांच्या किमती, पुनर्वसन आराखडा, यासारखे विविध प्रश्न सोडवले जात नाहीत तोपर्यंत मतदान न करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला.
हेही वाचा… Raigad Teachers News : देशाचं भविष्य घडवणाऱ्या गुरुजींची अल्प वेतनावर गुजराण
या संदर्भात प्रकल्पग्रस्त आणि संघर्ष समितीचे पदाधिकारी 12 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, केंद्रीय निवडणूक आयोग, तहसीलदार यांची भेट घेऊन त्यांना या बाबतचे निवेदन देणार आहेत, अशी माहिती बाळगंगा संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली.