राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपावर शरसंधान केले आहे. भाजपा हा मित्रपक्षांना हळूहळू संपवतो. नितीश कुमार यांचीही हीच तक्रार होती आणि महाराष्ट्रातही हेच पाहायला मिळाले, असं म्हणत शरद पवारांनी धनुष्यबाणावर देखील वक्तव्य केलं आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचं आहे. त्यामुळे एखाद्या पक्षाचं चिन्ह काढून घेणं योग्य नाही. माझ्यात आणि काँग्रेसमध्ये देखील असेच वाद झाले होते. परंतु त्यावेळी आम्ही वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर घड्याळ हे चिन्ह घेतलं होतं, असं शरद पवार म्हणाले. दरम्यान, शरद पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते, असं प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना दिलं आहे.
पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते
देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शरद पवारांनी पक्ष बदलला त्यावेळी कायदेच नव्हते. त्यामुळे कोणालाही कसंही बदलता येत होतं. मात्र, आज याबाबत कायदे तयार झाले असून, त्यामुळे कायदेशीर लढाई करावी लागते. या सर्वांवर शिंदे कायदेशीर लढाई करत असल्याचेही फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.
पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं
मला तर हे समजत नाही की, आमचा जो मित्र आहे शिवसेना (शिंदे गट) त्यांच्यासोबत 50 लोकं आहेत आणि आम्ही 115 लोकं आहोत. त्यांना आम्ही मुख्यमंत्री पद दिलं आहे. काल त्यांचे नऊ आणि आमचे नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांची शपथ झालेली आहे. त्यामुळे पवार साहेबांचं दुःख जरा वेगळं आहे असं मला वाटतं आणि ते आपल्या सर्वांनाच माहिती आहे असे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हेही वाचा : भाजपा मित्रपक्षांना हळूहळू संपवते, शरद पवारांचे नितीश कुमारांना समर्थन
शरद पवार काय म्हणाले होते?
माझ्यात आणि काँग्रेसमध्ये देखील असेच वाद झाले होते. परंतु त्यावेळी आम्ही वेगळा पक्ष स्थापन केल्यानंतर घड्याळ हे चिन्ह घेतलं होतं. आम्ही त्यावेळी त्यांचं चिन्ह मागून वाद वाढवला नव्हता, असं शरद पवार म्हणाले होते.