मशिदींवरील भोंग्यांविरोधातील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे राज्यात आता सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सरकारला राज ठाकरेंनी ३ मे पर्यंत भोंगे उतरवण्याचे अल्टिमेटम दिला होता. भोंगे हटवण्यात आले नसल्यामुळे आता राज ठाकरे आक्रमक भूमिका घेणार आहेत. त्यातच इतर राज्यातील लोकं महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा कट रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पोलिसांना अलर्ट राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठका घेत राज्यातील परिस्थितीची माहिती घेतली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासोबत बैठक घेतल्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्यातील परिस्थितीवर चर्चा करण्यात आली आहे. तर गुप्तचर विभागाकडून महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी इतर राज्यातील लोक कट रचत आहेत.
राज्यातील पोलीस कारवाईसाठी सज्ज
राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच ३० हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व पोलिसांच्या सुट्ट्यासुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली आहे. राज्यात पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात नोटीस जारी करण्यात आल्या आहेत. १५ हजार नोटीस तर १४९ ची नोटीस १३ हजारच्या वरती जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस कायदा आणि सुव्यवस्था बिघडवू नये यासाठी कारवाई करत आहे. कोणी कायदा आणि सुव्यवस्था बिघडवली तर कठोर कारवाई करण्यात येईल.
राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न
राज्याबाहेरील लोकांना बोलवून दंगली घडवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात षडयंत्र सुरु आहे स्वतःची ताकद नाही म्हणून बाहेरून लोकं आणून राज्यात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. इथे केवळ ठाकरे सरकारचा शब्द चालले, अल्टिमेटमचं राजकारण चालणार नाही असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा : राज ठाकरेंना अटक झाल्यास राज्य सरकारनं तयार राहावे, संदीप देशपांडेंचा सूचक इशारा