चंद्रपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोमवारी (ता. 08 एप्रिल) चंद्रपुरात जाहीर सभा पार पडली. चंद्रपूरचे भाजपाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली-चिमूरचे भाजपाचे उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी मराठीतून म्हण सांगत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस ही कडू कारल्याप्रमाणे आहे, जे कधीच बदलणार नाही आणि सुधारणारही नाही, असा हल्लाबोल मोदींनी केला. (Lok Sabha Election 2024 PM Narendra Modi criticizes Congress by saying Marathi proverb )
चंद्रपुरातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठीतून भाषणाला सुरुवात केली आणि यावेळी त्यांनी मराठीतील प्रचलित म्हण सांगतच काँग्रेसवर निशाणा साधला. आमचे गडचिरोली आता पोलाद सिटी बनत आहे. आमच्या इथे मराठीत एक म्हण आहे. कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच. ही म्हण काँग्रेसला लागू होते. कारण ते कधीही सुधारणार नाही आणि बदलणार नाही, असे टीकास्त्र मोदींनी डागले.
मराठीत भाषणाला सुरुवात करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, माता महाकालीच्या पावन भूमीत शक्तीला नमन करतो. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो. उन्हाचा पारा वाढत आहे, तसेच प्रचाराचा पाराही वाढताना दिसत आहे. पण तुमच्या उत्साहात कोणतीही कमी बघायला मिळत नाही. यावर्षी चंद्रपुरानेही ठरवले आहे की, पुन्हा एकदा मोदी सरकार, चंद्रपुरकडून एवढा मोठा स्नेह मिळणे माझ्यासाठी आणखी विशेष आहे. ही चंद्रपुरी आहे ज्याने अयोध्येत भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी लाकूड पाठवले. नव्या भारताच्या प्रती संसदेच्या नव्या इमारतीसाठीसुद्धा चंद्रपूरचे लाकूड लागले आहे.चंद्रपूरची ख्याती पूर्ण देशात पोहोचली आहे. मी चंद्रपूरच्या नागरिकांना खूप शुभेच्छा देतो. उद्यापासून नववर्ष आणि नवरात्रीचा पावन पर्व सुरू होत आहे. सर्व देशवासियांना या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. समस्त बंधुबघिणींना गुढीपाडवा आणि नूतन वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा.
यावेळी त्यांनी पुढे म्हटले की, मोदी शाही कुटुंबात जन्माला येऊन पंतप्रधान बनलेला नाही. मोदी एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन, जनसामान्यांमध्ये राहून इथपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मला माहिती आहे, ज्या कोट्यवधी नागरिकांकडे घरे नव्हती त्यामध्ये दलित, मागास, आदिवासी यांचे जास्त प्रमाण होते. दलित, वंचित, आदिवासी यांच्या वस्तीत पाणी नव्हते. वीज नव्हती. याच समाजाच्या मुलांना शिक्षणाच्या अभावाने झुंजावे लागत होते. त्यामुळे मोदीने गॅरंटी दिली होती की, आमचे सरकार दलित, आदिवासी आणि मागास कुटुंबांचे जीवन बदलण्यासाठी काम करेल. मोदीने वंचितांचे जीवन बदलण्यासाठी निरंतर मेहनत केली आहे. देशात ज्या चार कोटी गरिबांना पीएम आवास मिळाले आहेत, त्यामध्ये याच वर्गाचे लोक जास्त आहे. आम्ही ज्या 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना मोफत उजाला योजनेतून सिलेंडर दिले ते याच वर्गासाठी दिले, अशी माहिती पंतप्रधान मोदींकडून देण्यात आली.
हेही वाचा… Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींची वॉरंटी पण काँग्रेसची न्यायाची गॅरंटी – विजय वडेट्टीवार