मुंबई : केंद्रात काँग्रेस सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. जीएसटीमुक्त शेती, स्वामिनाथन समितीच्या अहवालानुसार किमान आधारभूत किमतीचा कायदा, ३० लाख रिक्त सरकारी पदे भरणे, अग्निवीर योजना बंद करणार तसेच देशातील गरीब महिलांना वर्षाला एक लाख रुपये देणार असल्याची ग्वाही काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भंडारा जिल्ह्यातील सभेत बोलताना दिली. काँग्रेस पक्षाने जाहिरनाम्यात सर्वात महत्वाचे ५ मुद्दे दिले आहेत. हा जाहीरनामा खूप विचार करुन बनवला असून बंद खोलीत नाही तर देशभरातील लाखो लोकांना भेटून तो बनवला आहे. काँग्रेसचा जाहीरनामा खऱ्या अर्थाने ‘जन की बात’ आहे, असेही राहुल गांधी म्हणाले. (Lok Sabha Election 2024 Will give one lakh rupees to poor women words of Congress leader Rahul Gandhi)
विदर्भातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांची आज साकोलीत भव्य जाहीर सभा झाली. यावेळी बोलताना गांधी यांनी भाजप आणि मोदींवर जोरदार हल्ला चढविला. नरेंद्र मोदी २४ तास धर्म, हिंदू-मुस्लिम यावरच बोलतात. एका समाजाला दुसऱ्याविरोधात लढवतात आणि तुमची संपत्ती अदानीच्या घशात घालतात. जीएसटीच्या माध्यमातून मोदी सरकारने जनतेला लुटले आहे. नरेंद्र मोदी यांनी ओबीसी, शेतकरी, छोटे व्यापारी, कामगार, गरीब, आदिवासी यांच्यासाठी काय केले? देशात सर्वात मोठा प्रश्न महागाई आणि बेरोजगारीचा आहे, पण मोदी त्यावर कधीच बोलत नाहीत. कोरोना काळात गंगा नदीत हजारो मृतदेह दिसत होते. पण नरेंद्र मोदी मात्र जनतेला टाळ्या वाजवा, थाळ्या वाजवा, मोबाईल टॉर्च लावा असे सांगत होते. कधी ते समुद्राच्या तळात जातात आणि पूजा करतात. मोदींनी देशाची थट्टा चालवली आहे, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : अखेर भावना गवळींची नाराजी दूर; राजश्री पाटलांच्या प्रचारात सक्रिय होणार
एससी, एसटी, आदिवासी, ओबीसी समाजाची सरकारमध्ये भागिदारी अत्यल्प आहे. जेवढी लोकसंख्या तेवढाच अधिकार त्या समाजाला मिळाला पाहिजे यासाठी काँग्रेस सरकार सत्तेत येताच जातनिहाय जनगणना आणि आर्थिक, सामाजिक सर्वेक्षण करण्याचे क्रांतीकारी काम करणार आहे, असे राहुल गांधी म्हणाले. केंद्रातील सरकार मोदींचे नाही तर अदानीचे आहे. नरेंद्र मोदींनी १० वर्षात त्यांच्यासाठीच काम केले. आज देशातील विमानतळे, बंदरे, रस्ते, खाण, कोळसा, सौरऊर्जा सर्वकाही अदानी यांचेच झाले आहे, असा आरोप त्यांनी केला.
युवांना न्याय मिळणार, डिग्री डिप्लोमा झालेल्या युवांना 1 वर्षांची नोकरी आणि त्याचे 1 लाख रुपये मिळणार -मा. राहुलजी गांधी pic.twitter.com/NH8nQKzG1q
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 13, 2024
तर जेव्हा समतेचा विचार अडचणीत आला. राज्यघटना, लोकशाही अडचणीत आली, काँग्रेस पक्ष अडचणीत आला तेव्हा विदर्भाची जनता काँग्रेस सोबत राहिली आहे. युपीए सरकार असताना अनेक विकास कामे केली. पण भाजपने धर्माच्या नावावर मते मागून समाजात वाद निर्माण केला. भाजप धर्माच्या नावावर मते मागत असून त्याला फसू नका. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहा. राहुल गांधी हे जनतेची गॅरंटी घेऊन आले आहेत. काँग्रेस पक्षाला मतदान करुन विजयी करा, असे आवाहन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी केले.
हेही वाचा – BJP Star Campaigner : एकनाथ शिंदे, अजित पवार आता भाजपाचे स्टार प्रचारक नाहीत; काय आहे कारण?