राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राज्याचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केला. हा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. या अर्थसंकल्पाचे स्वागत महाराष्ट्रातील जनता, माता भगिनी केल्याशिवाय राहणार नाहीत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया दिली आहे. अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री विधानसभेत उपस्थित होते. विधिमंडळाच्या बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी राज्याच्या आगामी दिशा दाखवणारा बजेट मांडला आहे. आपल्याला कल्पना आहे. गेली २ वर्ष वेगवेगळ्या आपत्तींना तोंड देत राज्याचा विकास सातत्याने पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. आजचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेले पुढचे पाऊल आहे. जे काही करणं शक्य आहे ते करत आलो आहोत. यापुढे सुद्धा करणार आहोत. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या राज्यातील सर्व माता आणि भगिनींचा विकास करणारा आणि त्यांना आधार देणारा आहे. मला खात्री आहे जनतासुद्धा त्याचे स्वागत केल्याशिवाय राहणार नाही असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज्य सरकारकडून विकासाची पंचसूत्री
महाविकास आघाडी सरकार राज्यात विकासाची पंचसूत्री राबवणार आहे. या अंतर्गत कृषी, आरोग्य, मनुष्यबळविकास, दळणवळण आणि उद्योग ही पंचसुत्री राबवणार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. भूविकास बँकेच्या प्रश्नावर महाविकास आघाडीच्या सरकारने ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी केली आहे. याचा फायदा ३५ हजार शेतकऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. शेतकऱ्यांसाठी मोठ्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल असेही अजित पवार म्हणाले आहेत.