राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. बहुमत सिद्ध करा, अशाा आशयाचे हे पत्र आहे. काल रात्रीच हे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले होते. राज्यपालांनी हे पत्र पाठवल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. 39 आमदारांनी पाठिंबा काढल्यानं सरकार अल्पमतात आल्याची माहिती राज्यपालांना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. त्यानंतर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना उद्या (30 जूनला) सकाळी 11 ते 5 यावेळेत मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्यास सांगणारे पत्र पाठवले आहे.
राज्यपालांच्या पत्रात काय –
- उद्या 11 वाजता विशेष अधिवेशन बोलवावे आणि त्यानंतर अधिवेशनाची कारवाई 5 वाजेपर्यंत पूर्ण केली जावी
- अधिवेशनाच्या बहुमत चाचणीचे थेट प्रक्षेपण केले जावे
- अधिवेशनावेळी जीवाला धोका असलेल्या सर्व बंडखोर आमदारांना सुरक्षा पुरवली जावी
देवेंद्र फडणवीसांची राज्यपाल भगतसिंग कोश्यारींकडे बहुमत चाचणीची मागणी –
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची राजभवनावर भेट घेतली आणि ठाकरे सरकारची बहुमत चाचणी घेण्याची मागणी केली होती. त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप नेते श्रीकांत भारतीय होते. देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर ते मुंबईत दाखल झाले. सागर निवासस्थानी भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांसोबत त्यांनी बैठक घेतली. ही बैठक पार पडल्यानंतर देवेंद्र फडणवीस राजभवनावर पोहोचले होते.
महाविकास आघाडी कोर्टात जाणार –
कोर्टात काही गोष्टी असताना, विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी दाद मागण्याची शक्यता आहे. कारण विधानसभा उपाध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव असल्याने नेमके काय घडते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
एकनाथ शिंदे उद्या मुंबईत पोहोचणार –
गुवाहाटी येथे बोलताना एकनाथ शिंदे यांनी उद्या मुंबईला पोहोचणार आहोत, अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता उद्याच बहुमत चाचणीला महाविकास आघाडी सरकराला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी विशेष अधिवेशन बोलले जाणार आहे. गुवाहाटीच कामाक्षी देवीच्या मंदिरासाठी गेले असता ते माध्यमांशी बोलत होते.