पासपोर्टच्या पडताळणीबाबत मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. संजय पांडे यांनी मुंबई पोलिसांचा कारभार जनताभिमुख करण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या मुंबईकर नागरिकांना पासपोर्ट पडताळणीसाठी मुंबई पोलिसांच्या कार्यालयात जावं लागायचं ते आता संजय पांडे यांच्या निर्णयाने बंद होणार आहे. याबाबत संजय पांडे यांनी मुंबईकरांना ट्विटद्वारे बातमी दिली आहे.
#PassportVerification. We have decided no citizen will be called to police station in Mumbai except in exceptional cases of documents being incomplete etc. If not followed do report🙏
— Sanjay Pandey (@sanjayp_1) March 12, 2022
भारतीय नागरिकाला एखाद्या कारणासाठी देशाबाहेर जायचं असल्यास त्यांच्याकडे पासपोर्ट असणं आवश्यक असतं. पासपोर्ट काढण्यासाठी पोलिसांकडून संबंधित व्यक्तिबद्दल पडताळणी केली जाते. यामध्ये पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीला पासपोर्ट पडताळणीसाठी पोलीस स्टेशनला जावं लागतं. या प्रक्रियेत अनेकदा वेळ लागतो. नागरिकांना देखील अनेकदा पोलीस स्टेशनला जावं लागतं. मात्र, आता संजय पांडे यांनी पासपोर्ट पडताळणीसंदर्भात घेतलेला निर्णय मुंबईकरांसाठी दिलासादायक ठरणार आहे.
पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईकरांना आता पोलीस स्टेशनला यावं लागणार नाहाये. अपवादात्मक स्थिती असेल तरच पोलीस स्टेशनला यावं लागणार आहे, असं संजय पांडे म्हणाले. मात्र, एखाद्या ठिकाणी या निर्णयाचं पालन होत नसल्यास थेट तक्रार दाखल करा, असं पांडे म्हणाले.
संजय पांडे यांनी हा महत्त्वाचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईकरांनी सोशल मीडियावरून या निर्णयाचं स्वागत केलं आहे. संजय पांडे आगामी काळात मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून कोणते निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : Devendra Fadnavis : मुंबई पोलिसांची फडणवीसांना नोटीस, उद्या बीकेसीत राहणार हजर