आज बेरोजगारी आणि जुन्या पेन्शनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. जनतेचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. परंतु ज्या सत्तेनं आणि व्यवस्थेनं या महाराष्ट्राची दुर्गती केलेली आहे. त्या व्यवस्थेला थांबविण्यासाठी या पद्धतीचं एक मत करून या निवडणुकीतून पुढे जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. ही एका हुकुमशाही व्यवस्थेच्या विरोधातील लढाई आहे. त्यामुळे एकत्रित लढाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. ही लढाई आम्ही एकमताने लढणार आहोत. महाराष्ट्रातील पाचही जागा या महाविकास आघाडीच्या येतील अशा पद्धतीचं काम हे महाविकास आघाडीकडून केलं जाणार आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीबाबत महाविकास आघाडीची बैठक पार पडली. ही बैठक संपल्यानंतर नाना पटोले यांनी महाराष्ट्रातील जागा, निवडणूक आणि राज्य सरकारबाबत भाष्य केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल हे महाराष्ट्राच्या विचाराला बदनाम करण्यासाठी केंद्राने पाठवलेलं पिल्लू होतं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा सर्व महापुरूषांचं अवमान करण्याचं काम सातत्याने राज्यपालांकडून झालं. सातत्याने राजकीय वक्तव्य त्यांच्याकडून केली जातात. ईडी सरकारविरोधात ते एकही शब्द बोलत नाहीत. त्यामुळे केंद्रात बसलेल्या भाजपच्या सरकारने असं व्यक्तिमत्व पाठवलेलं आहे की, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला संपवण्याचं काम हे राज्यपालांकडून केलं जात आहे. परंतु हे भाजपला चांगलं वाटतंय. भाजपकडून लोकशाही व्यवस्थेला संपवण्याचं काम सुरू आहे आणि जनता हे सर्व पाहत आहे. जनता यांना योग्य वेळी उत्तर देईल, असं नाना पटोले म्हणाले.
नागपूरच्या अधिवेशनात सरकारने जी हुकुमशाही प्रवृत्ती ठेवली. राज्याच्या इतिहासात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं भाषण आणि आतापर्यंत झालेल्या मुख्यमंत्र्याचं भाषण आपण ऐका, कशापद्धतीने त्यांनी राज्याच्या हिताचं मार्गदर्शन केलं आणि आपले आताचे मुख्यमंत्री कसे बोलले. कोणत्याही प्रकारचं व्हिजन नसलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला पहिल्यांदा मिळालेला आहे. त्यामुळे या व्यवस्थेला बदलणं हे काँग्रेसची जबाबदारी आहे, असंही नाना पटोले म्हणाले.
हेही वाचा : अडीच वर्षाचं सरकार बंदिस्त असूनही वसुलीचा उच्चांक गाठला, फडणवीसांचा ठाकरेंना टोला