‘वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उमेदवार पळवले. या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती’, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या बोचरी टीका केली आहे. “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे”, अशा शब्दांत संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत खेरे यांच्यावर टीका केली. त्यामुळे राज्यात शिंदे गटाचे आमदार आणि शिवसेना नेते यांच्यातील वाद वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीनंतर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटाचे बंडखोर आमदार संजय शिरसाठ यांच्यावर टीका केली. त्यानंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आमदार संजय शिरसाठ यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीका केली. यावेळी ते म्हणाले की, “चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाची पराभवाला सुरुवात, असे सगळीकडे म्हटले गेले असते”, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
याशिवाय, “आता जे उमेदवार निवडून आले आहेत. ते याआधीही सदस्य होते. त्यांचे नेतृत्व मीच करत होतो. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास 40 हजार मतदार आहेत. या 40 हजार मतदारांनी आम्हाला बहुमत दिले आहे, याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर आम्हीही याचा स्वीकार केला असता”, असेही संजय शिरसाट यांनी म्हटले.
“चंद्रकांत खैरे यांना सध्याच्या घडीला ‘मातोश्री’ला खूश करायचे आहे. मीच कसा निष्ठावंत आहे, हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचे आहे. त्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे”, असा टोलाही यावेळी संजय शिरसाट यांनी खैरेंना लगावला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर 40 आमदारांनी त्यांच्या गटात सहभाग घेतला. त्यानुसार, एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार आणि 12 खासदारांनी केलेल्या बंड केला. त्यानंतर भाजपासोबत युती करत राज्यात शिंदे गट आणि भाजपा युतीचे सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, सरकार स्थापन होऊन महिना उलटला, तरी अद्याप मत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्यांकडून शिंदे गटावर टीका केली जात आहे.
हेही वाचा – या चर्चेवर विश्वास ठेवू नका; तेसज ठाकरेंबाबत आदित्य ठाकरेंचे स्पष्ट मत