राज्यात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. या सरकारकडून महाविकास आघाडीच्या अनेक कामांना आणि निधीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे सरकारवर विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली आहे. दुसरीकडे शिवसेना नेमकी कुणाची हा वाद सुरू असून धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा, शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे.
निवडणूक आयोगाकडे आम्हाला दोघांना जावं लागेल हे खरं आहे. जो निर्णय असेल तो दोघांनाही मान्य करावा लागेल. आमच्याकडे ४० आमदार, १२ नगरसेवक, जिल्हाप्रमुख, शाखाप्रमुख आहेत. तसेच आमच्याकडे जास्त संख्या आहे. त्यामुळे या धनुष्यबाणाचं चिन्ह आम्हाला मिळेल, असा दावाही शिरसाट यांनी केला आहे. त्याचप्रमाणे दोन ते तीन दिवसांत मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं देखील ते म्हणालेत.
गॅप भरुन काढण्यासाठीच स्थगिती दिलीय
२०२१ पर्यंतची कामं बंद करणं योग्य नाही. विकासाची कामं होती. कुणाच्या घरातील कामं नव्हती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. यावर देखील संजय शिरसाट यांनी अजित पवारांवर पलटवार केला आहे. आमच्या आमदारांना तुटपुंजा निधी आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना भरघोस निधी दिला गेला. हा गॅप भरुन काढण्यासाठीच शिंदे साहेबांनी स्थगिती दिलीय. निधीचं वाटप समान व्हायला हवं, यात सुडाचं राजकारण नाही, असं संजय शिरसाट म्हणाले.
आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही – गुलाबराव पाटील
न्यायालयाच्या लढाईत आम्हाला फारसं बोलता येणार नाही. पण अशा स्थितीत कोणत्याही ठिकाणी सामान्यत: डोकी मोजली जातात आणि डोक्यांनाच महत्त्व असतं. तसेच आम्ही अद्याप शिवसेना पक्ष सोडला नाही. त्यामुळे असा संभ्रम कुणी तयार करत असेल तर तो करू नये, असं आमदार गुलाबराव पाटील म्हणाले.
धनुष्यबाण हा आमचाच राहणार
पक्ष सोडला असता तर धनुष्यबाण कोणाचा, असा प्रश्न पडला असता. परंतु शिवसेना पक्षाने नैसर्गिक युती करावी, अशी मागणी आम्ही शिवसेना पक्षप्रमुखांकडे केली होती. पण ही मागणी न ऐकल्यामुळे आम्हाला हा उठाव करावा लागला. आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे धनुष्यबाण हा आमचाच राहणार, असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं आहे.
हेही वाचा : शिवसेनेपाठोपाठ काँग्रेसलाही धक्का, नेत्याचा कार्यकर्त्यासह शिंदे गटाला पाठिंबा