राज्यातील महाविकास आघाडीतील नेत्यांकडून सतत केंद्रीय तपास यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जातोय. यात केंद्रीय तपास यंत्रणांचा राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आरोप काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून होत आहेत. आता शिवसेनेतील वादावर तोडगा काढत निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं आणि शिंदे गट आणि ठाकरे गटाला नवीन चिन्ह दिलं. ज्यावरून आता शिवसेनेतील नेत्यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तपास यंत्रणांची बाजू घेत शिवसेना नेत्यांच्या आरोपांवर पलटवार केला आहे.
फडणवीस म्हणाले की, आपली बाजू कमजोर असते तेव्हा घटनात्मक संस्थांवर आरोप करण्याची शिवसेना आणि काँग्रेसची पद्धत आहे. या संस्था कमजोर करण्याचे प्रयत्न शिवसेना आणि काँग्रेसकडून केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राज्याच्या राजकारणात चांगल्याच राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेतील दोन्ही गटांत सामना रंगला असून भाजपकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे. यात धनुष्यबाण गोठवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंसह शिवसेना नेत्यांनी संताप व्यक्त केला. शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठविण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर नेत्यांनी आयोगावर आरोप केल्याचे फडणवीसांनी म्हटले.
शिवसेनेने जेवढा वेळ मागितला, तेवढा वेळ आयोगाने दिला, अनेकदा विनंती करण्यात आली मात्र वेळ काढून कायदेशीर प्रक्रिया टाळता येत नाही. त्याला सामोरे जावे लागेल. आयोगाने हा अंतिम आदेश दिला नसून तो अंतरिम आदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या बाजूने निर्णय दिला, की ते उत्तम म्हणायचे. पण मनाविरुद्ध निर्णय दिला की टीका करायची, अशी यांची भूमिका आहे, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच गेल्या काही वर्षांत अन्य राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांमध्ये फूट पडली, तेव्हा आयोगाने अशाच पद्धतीने निर्णय दिला आहे. अशी माहिती देत आयोगाविरोधात रडगाणे राजकीय आहे असा आरोपही फडणवीसांनी केला.