आज महाराष्ट्रात काहीही होऊ शकतं. लोक अत्यंत असुरक्षित आहेत. या सरकारच्या नेतृत्त्वाखाली सर्वात असुरक्षित जर कोणतं राज्य असले तर ते महाराष्ट्र आहे, असं मोठं विधान आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यातील सत्ताबदलामुळे शिवसेना पक्षात उभी फूट पडली. यानंतर खरी शिवसेना कोणाची यावर गेल्या 6 महिन्यांपासून न्यायालयीन संघर्ष सुरु आहे. यात आजही सर्वोच्च न्यायालय आणि निवडणुक आयोगासमोर या प्रकरणावर सुनावणी होणार आहे. या सुनावणीच्या पार्श्वभूमावर आज संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.
महाराष्ट्रात कोणालाही केव्हाही तुरुंगात टाकलं जाईल
यावेळी बोलताना राऊतांनी केंद्रातील भाजप आणि राज्यातील भाजपच्या नेतृत्त्वाखाली शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कोणालाही केव्हाही तुरुंगात टाकलं जाईल. केंद्रात आणि राज्यात असलेले महाराष्ट्रातील मंत्री उघडपणे कोणालाही पोलिसांच्या नावाने तुरुंगात टाकण्याच्या धमक्या देतात.
पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडांप्रमाणे करु नका
पोलिसांचा वापर भाडोत्री गुंडांप्रमाणे करु नका, असं आवाहन करत राऊत पुढे म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याच्या राज्यासाठी देशात प्रसिद्ध होतं. अत्यंत सुरक्षित असलेल्या या राज्यातील पोलीस आणि तपास यंत्राणांची प्रतिष्ठा जगात होती, ती अशाप्रकारे राजकीय स्वार्थासाठी, वैयक्तिक स्वार्थासाठी रसातळा नेऊन महाराष्ट्राचं नाव बदनाम करु नका, असही राऊत म्हणाले.
शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपचे धोरण
राजकीय खेळीसाठी कुणावरही गुन्हे दाखल केले जात आहेत. आधी शिवसेनेचे तुकडे करा हे भाजपचे धोरण आहे. भाजपला महाराष्ट्राचे तुकडे करायचे आहेत. आणि त्यासाठीच त्यांनी शिवसेनेचे दोन तुकडे केले, असा गंभीर आरोप पुन्हा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
मविआमधील नेत्यांविरोधात होत असलेल्या कारवाईविरोधात राऊत म्हणाले की, राजन साळवी, वैभव नाईक, नितीन देशमुख यांना एका एसीबीची नोटीस आली. आम्ही ईडीच्या चक्रातून, न्यायालयातून बाहेर पडलो, अशी आमची अनेक लोकं आहेत ज्यांच्यावर तपास यंत्रणेच्या तलवारी मारल्या जातायत, लटकत ठेवल्या आहेत. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात भ्रष्ट्राचार, आर्थिक गैरव्यवहार, घोटाळ्याची जी प्रकरणं काढली ती एसीबीला दिसत नाहीत का? एसीबीने आमच्याकडे बघण्यासाठी वेगळा चष्मा लावला आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सरकारमधील आमदार, मंत्र्यांचे कोट्यावधीचे घोटाळे बाहेर काढले मात्र आमच्यावर दबाव आणण्यासाठी अशाप्रकारे चौकश्या केल्या. कल्याणमधील आमच्या पक्षाचे नेते, प्रमुख पदाधिकारी विजय सावळी यांच्यावर फक्त राजकीय आंदोलनाचे गुन्हे आहेत. रस्ता रोको, घेराव घालणं असे गुन्हे दाखल आहेत, त्यांना तडीपारीचे नोटीस दिली, अशा तडीपाऱ्या सुरु आहे. उद्या आमच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल कराल कारण देशात काहीही होऊ शकतं, असा आरोपही राऊत यांनी केला आहे.