भाजप नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरुच आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या मालकीचे असलेल्या १९ बंगल्याची पाहणी करण्यासाठी किरीट सोमय्या आज रायगड दौऱ्यावर आहेत. त्यादरम्यान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांवर नवा आरोप केला आहे. अर्णब गोस्वामीला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी अन्वय नाईकांना धमक्या दिल्या आहेत. आणि अन्वय नाईकांचा मारेकरी आज त्याच जमिनीवर जात आहे, असे संजय राऊत म्हणाले.
भाजपला भुताटकीने झपाटलंय – संजय राऊत
माध्यमांसोबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘कोर्लईतील जमिनीवर एकही बंगला नाही, एकही बांधकाम नाही. किरीट सोमय्यांना स्वप्नात बंगले दिसतात. हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे, बहुतेक भारतीय जनता पक्षाला भुताटकीचे झपाटले आहे. त्यांच्या स्वतःच्या बेनामी प्रॉपर्टी आणि बंगले त्यांना स्वप्नात दिसतात आणि ते दुसऱ्यांचे आहेत म्हणून बोंबलतायत. त्या जागेचे मूळ मालक अन्वय नाईक आहेत. अन्वय नाईक यांना आत्महत्या का करावी लागली? यावरती ते बोलत नाहीत. याच्यावरती भाजपच्या लोकांनी बोलायला पाहिजे.’
पुढे म्हणाले की, ‘अन्वय नाईक यांना भाजपमुळे आत्महत्या करावी लागली. त्यांच्या गुन्हेगारांच्या समर्थनार्थ हे सर्व लोकं कोर्टबाज्या, पत्रकबाज्या करत होते. एक मराठी माणूस, एक मराठी उद्योजक अन्वय नाईक यांनी भाजपच्या दबावामुळे आत्महत्या केली. कारण अर्णव गोस्वामीला हे लोकं वाचवत होते. किरीट सोमय्यांनी सुद्धा अन्वय नाईक यांना दोन वेळा बोलावून धमक्या दिल्या होत्या. अर्णब गोस्वामीकडे पैसे मागायचे नाहीत, अर्णबला बिल पाठवायचे नाही, अशा प्रकारच्या धमक्या सोमय्यांनी अन्वय नाईकांना दिल्या होत्या. या धमक्यानंतर अन्वय नाईकने आत्महत्या केली.’
‘भाजपच्या लोकांनी अन्वय नाईक यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले असून हा खूप मोठा गुन्हा आहे. या लोकांना महाराष्ट्र आणि मुंबईतून मराठी जनतेला संपवायचे आहे. तसेच जे छोटे-मोठे व्यवसाय करतात, त्यांनाही भाजप संपवू इच्छितात. आता अन्वय नाईक यांची हत्या करणारा आज त्याच जमिनीवर जात आहे. सोमय्यांचा खेळ संपतोय म्हणून त्यांची पळापळ चालू आहे. दोघे बापलेक जेलमध्ये जाणाराच,’ असा दावा संजय राऊतांनी केला आहे.
हेही वाचा – Exclusive : 25 हजार कोटींच्या महाआयटी घोटाळ्याचा आरोप राऊतांवरच होणार बुमरँग!