शिवसेनेने विदर्भ आणि मराठवाड्यात शिवसंपर्क अभियानाला सुरुवात केले आहे. यातून शिवसेनेने जिल्ह्या-जिल्ह्यात विखुरलेल्या पक्षाची मोर्चाबांधणी सुरु केली आहे. पण या अभियानात यवतमाळ-वाशिम मतदारसंघात खासदार भावना गवळी कुठे दिसेनाश्या झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी समस्या मांडायच्या कोणाकडे असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानापासूनही भावना गवळी दूर आहेत. त्यामुळे भाजपने हीच संधी साधत खासदार भावना गवळी हरवल्याची बॅनरबाजी केली आहे. भाजपने शहरातील एलआयसी चौकात ‘आमच्या खासदार ताई हरविल्या आहेत, खासदार दाखवा बक्षीस मिळवा’ अशा आशयाचे बॅनर झळकवले आहेत. मात्र शिवसैनिकांनी प्रत्युत्तर देत हे बॅनर हटवले आहेत.
भाजपने या बॅनरमधून खासदार भावना गवळी यांनी शोधून आणणाऱ्याला बक्षीस जाहीर केले आहे. इतकेच नाही तर, भाजपच्या महिला सेलच्या पदाधिकारी माया मोरे यांनी पोलीस ठाण्यात खासदार हरविल्या आहेत अशी तक्रार दाखल केली.
खासदार भावना गवळी मागील सहा महिन्यांपासून मतदारसंघात आल्या नाहीत, त्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय अशी लेखी तक्रार माया मोरे यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात शिवसेना विरुद्ध भाजप असे राजकारण रंगले आहे. दरम्यान शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानात भावना गवळी कुठे दिसल्या नाही त्यामुळे शिवसैनिकांसह राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेय.
मात्र मागील काळापासून शिवसेना नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत आहेत. यात खासदार भावना गवळी यांना देखील ईडीने समन्स बजावला होता. तेव्हापासूनच भावना गवळी अचानक सार्वजनिक पटलावरुन दूर झाल्यासारखा झाल्या. याआधी खासदार भावना गवळी त्यांच्या मतदारसंघात 27 सप्टेंबर 2021 रोजी कार्यकर्त्यांना खुल्या पद्धतीने भेटल्या होत्या. मात्र त्यानंतर तीन-चार दिवसांतच त्यांना ईडीचे पहिले समन्स बजावले, तेव्हापासून भावना गवळी शिवसेनेच्या कोणत्याच कार्यक्रमात, सभांमध्ये दिसून आल्या नाहीत. सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहणार हे त्यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनाही कळवले होते. त्यामुळे त्यांच्या मतदारसंघाची जबाबदारी अभियानप्रमुख म्हणून प्रतापराव जाधव यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यात अवैध गर्भलिंग तपासणी रोखण्यासाठी काय उपाययोजना आहेत?; पटोलेंच्या प्रश्नावर टोपेंनी दिले उत्तर