एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेतील ३४ आमदार आपल्या गळाला लावले. मात्र, त्यातील २ आमदार परत आले आहेत. त्यातील एक आमदार म्हणजे अकोल्याच्या बाळापूरचे आमदार नितीन देशमुख. एकनाथ शिंदे यांनी एक पत्रावर सर्व आमदारांची सही घेतली होती. या पत्रात नितीन देशमुख यांचीही सही आहे. मात्र, त्या पत्रातील सही माझी नसल्याचा दावा नितीन देशमुख यांनी केला आहे. (The letter written by Shinde is not mine, claims Nitin Deshmukh)
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्यातील राजकारणाला वेगळं वळण मिळालं. सूरतवरून हे प्रकरण थेट आता गुवाहाटीमध्ये पोहोचलं आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या पत्रात शिंदे गटातील आमदारांची सही आणि नावे आहेत. या पत्रात नितीन देशमुख यांचं तिसऱ्या क्रमांकावर नाव आणि सही आहे. मात्र, या पत्रातील सही माझी नाही, असं नितीन देशमुख यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता शिंदेंनी नेमकी कोणाची सही घेतली हा प्रश्न उपस्थित होत आहे.
हेही वाचा – मला हार्ट अटॅक आलाच नाही, बळजबरीने इंजेक्शन टोचलं; नितीन देशमुखांनी सांगितली आपबिती
दरम्यान, आमदार नितीन देशमुख यांना फसवून सूरतला नेले असल्याचा दावाही त्यांनी सकाळी केला होता. मला हार्ट अटॅक आलाच नव्हता असंही ते म्हणाले. आमदार नितीन देशमुख म्हणाले होते की, ‘माझा रक्तदाब वाढला नव्हता. पण मला हार्ट अटॅक आल्याचा बनाव रचण्यात आला. मला रुग्णालयात नेल्यानंतर २०-२५ जणांनी पकडून बळजबरीने इंजेक्शन टोचले. ते इंजेक्शन काय होतं माहिती नाही.’
ते पुढे म्हणाले की, ‘मी रात्री १२ वाजता हॉटेलमधून निघालो. रात्री तीन वाजता रस्त्यावर उभा होतो. माझ्यापाठी २०० पोलीस होते. पण मला कोणी लिफ्ट दिली नाही. त्यानंतर पोलिसांनी मला रुग्णालयात नेलं आणि मला हार्टअटॅक आल्याचा बनाव रचला. अटॅकचं कारण सांगून मला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.’
मी उद्धव ठाकरेंचा शिवसैनिक आहे. मी मंत्र्यांसोबत गेलो होतो पण मी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेबांचा शिवसेैनिक आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं.