कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच धार्मिक स्थळं बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोरोना संसर्गाचे संकट असले तरी आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असून रेस्टॉरंट व बारही ५० टक्के सुरू झाले आहेत. दरम्यान जैन धर्मियांच्या शुक्रवार, २३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ‘आयंबील ओळी’ या नऊ दिवसांच्या उत्सवाला मुंबई हायकोर्टाने परवानगी दिली आहे. या उत्सवांतर्गत भाविकांना मंदिरातील भोजनालयात प्रसाद देण्यासाठी मर्यादित प्रमाणात परवानगी देणारा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी काढला.
जैन मंदिरांतील भोजनालयात भाविकांना वर्षभर विशिष्ट प्रकारचा प्रसाद दिला जातो. मागील सात महिन्यांत तो लाभ भाविकांना घेता आला नाही. २३ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत आयंबील ओळी उत्सवानिमित्त उपवास करून मंदिरात प्रसादाचा आहार घेणे हे भाविकांसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आत्मकमल लब्धीसुरिश्वरजी जैन ज्ञानमंदिर ट्रस्ट आणि शेठ मोतीशा धार्मिक ट्रस्टतर्फे याचिकांद्वारे न्यायालयाला विनंती करण्यात आली होती.
Bombay High Court on Wednesday allowed Jain temples to reopen dining halls during 9-day fasting festival Ayambil Oli Tap from Oct 23. Temples will have to follow SOP issued by the state govt for restaurants & will not be opened for devotees to offer prayers pic.twitter.com/4b1dDJUoI1
— ANI (@ANI) October 22, 2020
यामध्ये असे म्हटले होते की, जैन मंदिरांतील भोजनालयात भाविकांना दिला जाणाऱ्या विशिष्ट प्रकारच्या प्रसादाचे खूप महत्व असते. मेट्रो, मोनो रेल सुरू होण्यासह विविध गोष्टी सुरू झाल्या असताना या नऊ दिवसांच्या काळात सकाळी १० ते दुपारी ३ या मर्यादित वेळेत आणि एका वेळी केवळ ४० जणांना टोकन देऊन प्रसादाचा लाभ घेण्यासाठी दिवसाला कमाल दोनशे भाविकांना प्रवेश देण्यास हरकत नसावी. हा प्रवेश मंदिरातील दर्शन व प्रार्थनेसाठी नसेल, केवळ प्रसादासाठी असेल, असे त्या विनंतीत सांगण्यात आले आहे.
जैन मंदिरांबाबत हा महत्त्वाचा आदेश
या याचिकांवर सरकारकडून राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी मत मांडले आहे. ‘कोरोनाच्या संकट काळात कोणत्याही प्रकारे जमाव जमण्यास राज्य सरकारचा विरोध आहे आणि एका धर्माला परवानगी देण्यात आली तर अन्य धर्मीयांकडूनही मागणी होईल. त्यामुळे या याचिकांना सरकारचा विरोध आहे’ तसेच रेस्टॉरंटसह विविध गोष्टी सुरू झालेल्या असताना सुरक्षित अंतर व अन्य नियम पाळून केवळ मंदिरातील भोजनालयात जाण्यास जैनधर्मीयांना परवानगी नाकारली तर ते भेदभावपूर्ण ठरेल’, असे निरीक्षण नोंदवून न्या. शाहरुख काथावाला व न्या. व्ही. जी. बिश्ट यांच्या खंडपीठाने मंदिरांना तशी व्यवस्था करण्याची परवानगी दिली.
मात्र ‘भाविकांना मंदिरातील अंतर्गत भागात प्रार्थना, पुजेसाठी प्रवेश नसेल. मंदिर व्यवस्थापनांनी भाविकांना पाण्याच्या बाटल्या न देता उकळलेले पाणी पिण्यास द्यावे. तसेच कोरोना संदर्भातील सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे’,असेही खंडपीठाने दिलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.