मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा मोठं वादग्रस्त विधान केलं आहे. दिल्लीचे पंतप्रधान अरविंद केजरीवाल यांना अटक योग्य असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही अटक केली पाहिजे, असं धाडसी विधान त्यांनी केलं आहे. प्रकाश आंबेडकरांच्या या वक्तव्यानं खळबळ उडाली आहे. त्याचवेळी त्यांना पुन्हा एकदा संजय राऊतांना लक्ष्य केलं आहे.
हेही वाचा… Prakash Ambedkar : संजय राऊत किती खोटं बोलाल; आंबेडकरांकडून संताप व्यक्त
दिल्ली सरकारच्या मद्य धोरण प्रकरणात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक होऊ शकते तर राफेल विमान खरेदी प्रकरणात नरेंद्र मोदी यांना अटक केली पाहिजे, असं थेट विधान प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना केलं. कॅबिनेटचा विषय हा कोर्टाचा आणि चौकशीचा विषय होऊ शकत नाही. त्यामुळे जो न्याय केजरीवालांना लावला तोच न्याय मोदींना लावायला हवा, याकडे प्रकाश आंबेडकरांनी लक्ष वेधलं.
हेही वाचा… Loksabha 2024: श्रीनिवास पाटील यांची माघार; शरद पवार करणार नव्या उमेदवाराची घोषणा
राऊतांकडून बिघाड
प्रकाश आंबेडकरांनी आज पुन्हा एकदा संजय राऊतांवर टीकेचा जहरी बाण सोडला. ‘संजय आघाडीत बिघाड करतोय, महाविकास आघाडीची चुकीची माहिती देतोय’, असे गंभीर आरोप प्रकाश आंबेडकरांनी केले. त्याचवेळी मी उद्धव ठाकरेंवर नाराज नाही, असंही स्पष्ट केलं.
सुभाष देसाई असेपर्यंत…
प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी संजय राऊत यांनी आघाडीत कसा खोडा घातला हे सांगताना सुभाष देसाईंचं उदाहरण दिलं. महाविकास आघाडीच्या चर्चेत सुभाष देसाई असेपर्यंत सर्व ठीक होतं… पण नंतर कोणाला तरी कुणासाठी वापरायचं असा हिशेब सुरू झाला, या शब्दांत आंबेडकरांनी राऊतांना लक्ष्य केलं. त्याचवेळी आम्हाला फक्त तीन जागांचा प्रस्ताव होता, त्यात अकोला लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता, असा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला.
2 एप्रिलपर्यंत धीर धरा!
दरम्यान, महाविकास आघाडीसोबत आहात का, नक्की आघाडीत काय घडलं, मनोज जरांगे-पाटील यांच्याशी काय चर्चा झाली या सर्व बाबींवर 2 एप्रिलला उत्तरे देणार, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं. त्याचवेळी महाविकास आघाडीचे दरवाजे अजून बंद केलेले नाहीत, असंही आंबेडकरांनी स्पष्ट केलं.