मुंबई : एकीकडे शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे तर, दुसरीकडे शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असल्याने शिंदे-फडणवीस सरकारच्या भवितव्याबद्दलही चर्चा रंगली आहे. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका ट्वीटवरून तर्कवितर्क मांडण्यात येत आहेत.
उनकी मुस्कुराहट पर न जाना,
दिया तो कब्र पर भी जल रहा है!!
Wait and watch. pic.twitter.com/rMZnNILHs1— Sanjay Raut (@rautsanjay61) July 17, 2022
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी ‘उठाव’ केला. त्यामुळे शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. तथापि, दोन्ही गटांना एकत्र यायचे आहे, पण मानापमानात सर्व अडकले आहे, असे शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी म्हटले आहे. तर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हे दोन्ही गट एकत्र येतील का हे येणारा काळ ठरवेल, असे म्हटले आहे. ते आमचेच सहकारी, आमचेच मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे पुन्हा एकत्र यावे असे का वाटणार नाही, असा सवाल देखील राऊत यांनी केला आहे.
त्याचबरोबर आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. यासाठी स्वतंत्र घटनापीठाची स्थापना करावी लागेल आणि तोपर्यंत यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय घेऊ नये, अशी स्पष्ट सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. याच अनुषंगाने संजय राऊत यांनी काल ट्वीट करत, महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी असूनही इथे २ मंत्री हवे तसे निर्णय घेत आहेत. इथे राज्यघटनेचं पालन होतंय का? जोपर्यंत सर्वोच्च न्यायालय यासंदर्भात निर्णय देत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी”, अशी मागणी केली आहे.
हेही वाचा – तीन मोदी… अन् हर्ष गोयंका यांचे मजेशीर ट्वीट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपा व शिंदे समर्थक आमदारांचा, बहुमताचे पत्र राज्यपालांना देत असल्याचा फोटो संजय राऊत यांनी आज दुपारी शेअर केला आणि ‘उनकी मुस्कुराहट पर न जाना, दिया तो कब्र पर भी जल रहा है! Wait and watch…’ असे ट्वीट केले आहे. त्याबद्दल विविध तर्कवितर्क व्यक्त करण्यात येत आहेत.