सुरत सत्र न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच उच्च न्यायालयात अपील करण्याची मुभा दिलेली आहे. राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे ते अपील करणार आहेत, असे असताना भाजपच्या सरकारने तातडीने त्यांची खासदारकी रद्द करणे चुकीचे आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. सरकारने किमान उच्च न्यायालय ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द केली नसती आणि सरकारने आपला अधिकार वापरला असता तर योग्य झाले असते. मात्र आता केवळ द्वेष भावना असल्याचे याठिकाणी दिसत आहे. त्यामुळे सचिवालयाने एवढी घाई करण्याची गरज काय होती? असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधी यांना सुरत सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. पण या कारवाईनंतर विरोधकांकडून मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात येत आहे. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय हा द्वेष भावनेतून घेण्यात आला आहे, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
सरकाराने किमान उच्च न्यायालयात ती ऑर्डर रद्द करते का याची वाट बघायला पाहिजे होती. उच्च न्यायालयाने ऑर्डर रद्द केली नसती तर सरकारने आपला अधिकार वापरला तर ते योग्य ठरले असते. मात्र आता झालेली कारवाई ही केवळ द्वेष भावना असल्याचे दिसत आहे, अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
( हेही वाचा: राहुल गांधींना खासदारकीपासून ‘मुक्ती’ मिळाली; भाजपचा खोचक टोला )
चोराला चोर म्हणणं हा देशात ठरला गुन्हा- उद्धव ठाकरे
राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर देशभरातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्रातही विरोधक आक्रमक झाले आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील कडक शब्दांमध्ये संताप व्यक्त केला आहे. चोराला चोर म्हणणे हा आपल्या देशात गुन्हा ठरला आहे. चोर आणि देश लुटणारे आजही मोकळे आहेत आणि राहुल गांधी यांना शिक्षा ठोठावली गेली. लोकशाहीचे हे सरळ हत्याकांड आहे. सर्व सरकारी यंत्रणा दबावाखाली आहेत. हुकूमशाहीच्या अंताची ही सुरुवात आहे. फक्त लढाईला दिशा द्यावी लागेल, यासाठी काॅंग्रेस सोबत आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.