गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आणि विशेषतः कोकणवासीयांच्या अस्मितेचा, श्रध्देचा, जिव्हाळ्याचा आणि संस्कृतीचा विषय आहे. गणेशोत्सवाची वाट प्रत्येक मराठी माणूस आणि विशेषतः कोकणवासीय वर्षभर बघत असतो. कामानिमित्त जगाच्या कोणत्याही कानाकोपन्यात असला, कितीही अडचणी असल्या तरी कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात आपल्या गावी जातोच. त्याची तयारी आणि नियोजन प्रत्येक कोकणवासीय चाकरमानी अगदी वर्षभरापासून करत असतो. गणेशोत्सव हा कोकणाचा मोलाचा ठेवा सांस्कृतिक संचित आहे. दरम्यान, गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, यामध्ये शंका आहे. परंतु या काळात अतिरिक्त रेल्वेगाड्या कोकणात सोडाव्यात, अशा प्रकारचं पत्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना दिलं आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणालेत?
गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत संथगतीने सुरु आहे. तसेच या महामार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. या महामार्गावरून प्रवास करणे अत्यंत त्रासदायक आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करणे हा पर्याय सुध्दा व्यवहार्य ठरत नाही. कोकणाला जोडण्यासाठी तसेच कोकणवासीय चाकरमान्यांच्या सोईसाठी महत्वकांक्षी कोकण रेल्वेची निर्मिती करण्यात आली आहे. कोकण रेल्वे ही कोकणवासीयांची जीवनवाहिनी आहे.
गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना आतापासूनच प्रतिक्षा यादीचे फलक लागले आहेत. मुंबईच्या छत्रपती टर्मीनसवरून दि. १५ सप्टेंबरला सुटणान्या कोकणकन्या एक्सप्रेसची प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनीटातच हजारापार गेल्याची बाब समोर आली आहे. तर दि. १६ सप्टेंबरचे आरक्षण करण्यासाठी गेलेल्या प्रवाशांना सर्वच गाड्यांसमोर रिग्रेट हा मेसेज येत आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांच्या आरक्षणात गैरप्रकार होत असावेत, अशी शंका घेण्यास वाव आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे.
गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळविण्याचा प्रयत्न करत असतात. गणेशोत्सव दि. २९ सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे दि. १७ सप्टेंबरचे या प्रवासाच्या तारखेचे १२० दिवस आधीचे आरक्षण शुक्रवारी खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे. अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे. तसेच कोकणच्या चाकरमान्यांच्या सोईसाठी गणेशोत्सव काळात अतिरिक्त रेल्वे गाड्या कोकणात सोडण्यात याव्यात, अशी मागणी देखील अजित पवारांनी या पत्राच्या माध्यमातून केली आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी घेतली दखल, नितेश राणेंची माहिती
नितेश राणे यांनी एक व्हिडीओ ट्वीट करत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दखल घेतल्याचं सांगितलं आहे. गणेशचतुर्थीला कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांची बुकिंग फुल्ल झाली आहे. त्यामुळे या बुकिंगमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आढळून आला आहे. काही मिनिटांमध्येच या बुकिंग फुल्ल झाल्या आहेत. यासंबंधीत असंख्य चाकरमानी आणि कोकणवासीयांनी आमच्याशी संपर्क साधला. त्यामुळे आम्ही याची दखल घेतली असून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी येत्या सोमवारी देशाच्या रेल्वेमंत्र्यासोबत दिल्लीला एका बैठकीचं आयोजन केलं आहे. जेणेकरून ज्या प्रकारचा त्रास कोकणवासीयांना होतोय. तो सर्व त्रास दूर करण्यात येईल आणि गणेशचतुर्थीसाठी त्यांचा प्रवास सुखकर करण्यात येईल, असं आमदार नितेश राणे म्हणाले.