पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या हटक्या शैलीतून सातत्याने राजकीय परिस्थितीवर प्रहार करत असतात. मला जे पटतं तेच मी बोलतो असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. एवढंच नव्हे तर पहाटेच्या शपथविधीवरूनही त्यांनी निशाणा साधला आहे. पुण्यात आयोजित केलेल्या १८ व्या विश्व मराठी संमेलनात त्यांनी विविध विषयांवर बिंधास्त आणि दिलखुलास मते मांडली.
हेही वाचा – सोशल मीडिया की वर्तमानपत्र? राज ठाकरेंचं आवडतं माध्यम कोणतं?
राज ठाकरे म्हणाले की, एखाद्या भूमिकेला विरोध करणं राजकारणात काहीच गैर नसतं. पण, जर त्या माणसाने काही चांगली कामं केली की त्याचं अभिनंदन करण्याचा मोठेपणा आणि मोकळेपणा आपल्यात असायला पाहिजे. २०१९ नंतर कलम ३७० रद्द होणं, रामजन्मभूमीचा विषय मार्गी लागलणं, अशा अनेक गोष्टी सरकारकडून झाल्या. म्हणून त्यांना चांगलं बोललो. पण आपल्याकडे विरोध म्हणजे विरोध. चांगलं बोलायचंच नाही. मी भूमिका बदलतो असं तुम्ही म्हणता. मग अडीच वर्षांपूर्वी एकमेकांना शिव्या घालणारे आज मांडीला मांडी लावून बसले आहे, त्यांना तुम्ही का बोलत नाही, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी पहाटेच्या शपथविधीवरूनही टोला लगावला.
सकाळी सहा वाजता जाऊन शपथ घ्यायची राज्यपालांकडे. परत त्यांच्याच विरोधात बसायचं, मग त्यांच्याशीच गोड गोड बोलायची. मी जरा व्यंगचित्रकाराच्या भाषेतच बोलतो. मी बैलासारखं मुतत माझा विचार नाही करत. बैल चालता चालता मुततो, असं राज ठाकरे म्हणाले. अर्थात त्यांचा हा रोख नक्की कोणावर होता हे राजकीय वर्तुळातील लोकांना वेगळं सांगायची गरज नाही.
हेही वाचा – मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना संधी मिळणार का? चित्रा वाघ म्हणाल्या, कॅलिबर महिलांना…
…हे पंतप्रधानांना शोभत नाही
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाकडे लक्ष दिलं पाहिजे. देशातील प्रत्येक राज्य त्यांना मुलासारखं असलं पाहिजे. ते गुजराती आहेत म्हणून गुजरातला प्राधान्य देणं हे पंतप्रधानांना शोभत नाही. माझं तेव्हाही म्हणणं होतं, आजही आहे. मनमोहन सिंग पंजाबी म्हणून ते पंजाबला नेणार. मग कोणीतरी तामिळनाडूवाला मुख्यमंत्री येईल आणि तो तामिळनाडूला जाणार, ही कोणती पद्धत? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.