अहमदनगर : आमची अडचण होत असेल, तर तुतारी वाजवून टाका, असे विधान अहमदनगरचे महायुतीचे भाजपातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यांनी केलेल्या या विधानाचा व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पण त्यांनी हे असे विधान कशामुळे केले, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. (Lok Sabha Election 2024 BJP MP Sujay Vikhe Patil statement about NCP Sharadchandra Pawar trumpet sign)
लोकसभा निवडणुकांच्या प्रचारसभांनी जोर धरला असून प्रत्येक उमेदवार स्वतःचा जोरदार प्रचार करत आहेत. विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांनीही प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे निलेश लंके निवडणूक लढत आहे. पण काल एका प्रचारसभेत बोलताना सुजय विखे म्हणाले की, काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा. आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका.
महायुतीचे उमेदवार असलेले सुजय विखे पाटील यांनी असे विधान केल्यानंतर आता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण स्वतः उमेदवार असूनही विखे पाटलांचे अशा प्रकारे विधान करणे आश्चर्यकारक आहे. त्यामुळे विखेंच्या या विधानाबाबत अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. तर, त्यांनी हे विधान केल्यानंतर भरसभेत सर्वांना हात जोडले. पण आपल्याच विरोधकांचे चिन्ह दाबा, असे बोलण्याची विखे पाटलांवर वेळ का आली? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
सुजय विखे हे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार आहेत. या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपाने त्यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे निलेश लंके आहेत. काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’, असे आव्हान दिले होते. त्यांनी दिलेल्या या आव्हानाचीही त्यावेळी मोठी चर्चा रंगली होती.