मा. बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे शपथ घेतो की… अशा शब्दात अखेर एकनाथ शिंदे यांनी आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गुरूवारी संध्याकाळी राजभवनात शपथविधीचा सोहळा पार पडला. मात्र मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यापूर्वी एकनाथ शिंदे यांनी फेसबुक या सोशल मीडिया अकाऊंटवरील प्रोफाईल फोटो बदलला आहे. जुन्या फोटोच्या जागी त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या चरणी बसलेला एका फोटो ठेवला आहे. एकनाथ शिंदे यांनी आयुष्यातील सर्वात मोठ्या क्षणावेळी आणि त्याआधीही बाळासाहेबांची आणि आनंद दिघे यांची आठवण काढत शिवसैनिकांनी भावनिक साद घालण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर 24 तासांच्या आतच एकनाथ शिंदेंनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे स्मरण करत अखेर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
#थेटप्रसारण:-
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून @mieknathshinde यांचा राजभवन येथे थपथविधी होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे श्री. शिंदे यांना मुख्यमंत्री पदाची शपथ देत आहेत.#Live https://t.co/yy2EUlM9OC— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 30, 2022
फेसबुकवरील प्रोफाईल फोटो बदलताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच एकनाथ शिंदे यांनी ट्विटवरील फोटो देखील बदलला आहे. या फोटोवर आता मोठ्याप्रमाणात लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. या फोटोखाली आता अनेकांकडून आपली मतमतांरे मांडली जात आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरीच्या दिवसापासूनचं आपण बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि शेवटपर्यंत राहणार अशी भूमिका मांडली. या फोटोतूनही त्यांनी आपण कायम बाळासाहेबांच्या विचारातून पुढे जाणार असल्याचे सूचवण्याचा प्रयत्न केला आहे.
कोण आहेत एकनाथ शिंदे?
एकनाथ संभाजी शिंदे हे शिवसेना नेते असून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री आहेत. या आधी २०१४ ते २०१९ पर्यंत एकनाथ शिंदे हे सार्वजनिक बांधकाम या खात्याचे कॅबिनेट मंत्री होते. २०१९च्या सुरुवातीपासून त्यांनी काही महिने आरोग्य खात्याची देखील जबाबदारी सांभाळली. ठाण्यातील कोपरी-पांचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा (२००९, २०१४ आणि २०१९) आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा (२००४) असे चार वेळा आमदार म्हणून विधानसभेवर निवडून गेले आहेत.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते १९८०च्या दशकात शिवसेनेत दाखल झाले. एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली आणि कठोर मेहनत, धडाडी, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची वृत्ती आणि प्रत्येक कामाला शेवटापर्यंत घेऊन जाण्याची धमक या वैशिष्ट्यांमुळे आज शिवसेना नेतेपदापर्यंत त्यांची वाटचाल झाली आहे.