केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या नेत्यांना हाताशी धरुन वेगळे सिंडिकेट चालवत असल्याचा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तसेच महाविकास आघाडीवर चिखलफेक सुरु आहे. परंतु चिखल फेकत असलेल्यांचे हात किती बरबटलेले आहेत हे सुद्धा देशाला कळाले पाहिजे. पंतप्रधान कार्यलायला पत्र लिहून माहिती दिली असल्याचेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून दुरुपयोग सुरु असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले की, केंद्रातील काही मोजक्या लोकांच्या आदेशानुसार सुडाच्या कारवाया सुरु आहेत. खासकरुन महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये सुरु आहे. जणू काही केंद्रीय तपास यंत्रणांना देशात काम नाही आणि महाराष्ट्रात काम आहे. महाराष्ट्रातच जास्त भ्रष्टाचार असल्याचे दाखवत आहेत. महाराष्ट्रातील नेत्यांना बदनाम करायचे, खोटे गुन्हे आणि प्रकरणं उभी करायची अशा प्रकारे प्रयत्न सुरु आहेत. परंतु जे चिखल फेकत आहेत त्यांचे हात किती बरबटलेले आहेत. हे देशाला कळाले पाहिजे. यामागे कोणते क्रिमीनल सिंडिकेट आहे. मोठ्या प्रमाणात त्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाला दिली आहे. हा एक रेकॉर्ड आहे की आम्ही कळवले असून तुम्ही काही करत नाही आहात असे संजय राऊत म्हणाले आहेत.
महाराष्ट्रातील तपास यंत्रणा यावर काम करतील. अनेख शाखा आहेत त्या त्यांच्या पद्धतीने काम करतील. परंतु तुमच्या केंद्रीय तपास यंत्रणा काय करतायत, भाजपच्या २ ते ५ लोकांना हाताशी पकडून कशा प्रकारे वेगळे सिंडिकेट चालवत आहेत. याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला दिली असल्याचे राऊत म्हणाले आहेत.
रश्मी शुक्लांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले
दरम्यान रश्मी शुक्ला फोन टॅपींग प्रकरणावर संजय राऊत म्हणाले की, आमच्या सगळ्यांचे फोन टॅप केले होते. रश्मी शुक्ला यांनी कोणाच्या आदेशाने फोन टॅप केले? यातून त्यांना काय सिद्ध करायचे होते. यातून सगळ्या गोष्टी हळूहळू बाहेर येतील. तपास यंत्रणा महाराष्ट्रात सुद्धा आहेत फक्त केंद्रात नाहीत असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.