भाजपला महाराष्ट्रात स्वत:च अस्तित्व दाखवण्यासाठी आजही आणि तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले, आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेनाची तुम्हाला मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत गरज लागते. अशा शब्दात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. तसेच भाजप अटलबिहारी वाजपेयी यांचा किंवा पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचांराचा राहिला आहे का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. आज मुंबईत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपवर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंसह बंडखोर आमदरांवार राऊतांनी निशाणा साधला.
यावेळी राऊत म्हणाले की, भाजपला महाराष्ट्रात स्वत:च अस्तित्व दाखवण्यासाठी आजही आणि तेव्हाही बाळासाहेब ठाकरे लागले, आजही बाळासाहेब ठाकरेंनी निर्माण केलेली शिवसेनाची तुम्हाला मुख्यमंत्री पदापासून ते विधानसभेच्या अध्यक्ष पदापर्यंत गरज लागते. यातच बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचे महत्त्व अधोरेखित होते. का तुमच्याकडे माणसं नव्हती? आणखी एक प्रश्न असा आहे की, देवेंद्र फडणवीस आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जर 50 आमदारांच्या गटाला किंवा 40 आमदारांच्या गटाला मुख्यमंत्री पद दिले, मग 2019 साली जेव्हा शिवसेना आपल्या हक्काची मागणी करत होती, 56 आमदार किंवा त्याहून जास्त आमदार असताना… तेव्हा तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला का नाकरलं. तेव्हा हेच बंडखोर आमदार पक्षामध्ये होते ना…. तेव्हा बाळासाहेबांची असली शिवसेना आठवली नाही का? असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.
शिवसेना फोडल्यानंतर दाब, दबाव आणि अमिषाला बळी पडून तुम्ही आज फुटीरांना म्हणता ही असली शिवसेना? महाराष्ट्रात सुरु असणारा ढोंगपणा बंद करा, तुमचं महाराष्ट्रात राज्य कस आलं हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिले. आम्ही तुम्हाला राज्य चालवण्यासाठी शुभेच्छा देतो हे तुमच्या मनाचं मोठेपण आहे. असे खडे बोलही राऊतांनी सुनावले आहेत.
तुम्ही जर एका गटाला मुख्यमंत्री पद देत आहात पण तुम्ही मराठी माणसाच्या आणि हिंदुत्वाच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना मुख्यमंत्री पद दिले नाही याचे तुमच्याकडे काय उत्तर आहे सांगा. असे म्हटले तर भाजप सुद्धा अटलबिहारी वाजपेयी यांचा किंवा पं. दीनदयाल उपाध्याय, श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचांराचा राहिला आहे का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या मातीत संत तुकारामांचे अभंग चालतात, मंबाजींचे नाही, असा दाखल देत राऊतांनी विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ढोंगाला स्थान नाही, खोटेपणाला स्थान नाही हा इतिहास आहे. शिवसेनेच्या पाठीत अनेकांनी वार केलेत. मात्र ते वार पचवून शिवसेना पुन्हा उभी राहिली आहे. असा विश्वासही राऊतांनी व्यक्त केला.