मु्ंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी ब्रिजेश सिंह यांची मुख्यमंत्री कार्यालयात सचिवदी करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिरवा कंदिल दिला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) माजी सनदी अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची नियुक्ती करण्यात येत आहे. हे दोन्ही अधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. त्यावरूनच ‘या अर्थ काय बरं?’ असा खोचक सवाल काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सचिन सावंत यांनी केला आहे.
मित्रच्या अध्यक्षपदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सहअध्यक्षपदी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. डिसेंबरमध्ये या संस्थेच्या उपाध्यक्षपदी प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अजय आशर आणि शिवसेनेचे माजी आमदार डॉ. राजेश क्षीरसागर यांची शिंदे-फडणवीस सरकारने नियुक्ती केली होती. अजय आशर हे ठाण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून गेली काही वर्षे ते एकनाथ शिंदे यांचे जवळचे मित्र म्हणून ओळखले जातात. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. तर, आता नियुक्ती करण्यात आलेले सीईओ प्रवीणसिंह परदेशी हे उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जातात.
उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमणूक होण्याचा अर्थ काय बरं?🤔
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) February 20, 2023
तर, फडणवीस सरकारच्या काळात माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक असलेले ब्रिजेश सिंह आता मुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयात सचिव म्हणून आले आहेत. ब्रिजेश सिंह हे सध्या अतिरिक्त महासंचालक (गृहरक्षक दल) या पदावर कार्यरत आहेत. सध्या भूषण गगराणी हे मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तर विकास खारगे हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत. ब्रिजेश सिंह यांचा माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात आणि फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संबंधित दोन्ही नियुक्त्या या फडणवीस यांच्या विश्वासातील व्यक्तींच्या असल्याने काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून याबाबत टीका केली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या विश्वासू अधिकाऱ्यांची मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात नेमणूक होण्याचा अर्थ काय बरं? असा खोचक सवाल त्यांनी केला आहे.