जालना : आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण देण्याची मागणी करण्यात आली. मनोज जरांगे पाटील यांचे जालन्यातील अंतरवाली येथे उपोषण सुरू असताना बीडमध्ये मराठा आंदोलकांना केलेल्या हिंसाचाराची घटना घडली होती. यावेळी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारांच्या घरे आणि कार्यालय पेटवली. यामुळे बीड हिंसाचार प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मला अटक झाल्यानंतर मराठा समाज काय आहे हे सरकारला कळेल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे.
मनोज जरांगे पाटील अटेकसंदर्भात म्हणाले, “दोन दिवसांत मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतो, असे सरकारने म्हटले होते. जर सरकारने गुन्हे मागे घेतले नाही तर मला अटक करायचे असेल तर मी करू द्या. मी तुरुंगात जायला घाबरत नाही. मला अटक झाल्यानंतर मराठा समाज काय आहे हे सरकारला कळेल”, असे ते म्हणाले.
हेही वाचा – MLA Disqualification Case : ठाकरे गटाने थेट पुरावा दाखवला; पण एकनाथ शिंदेंचा ई-मेल आयडी नेमका कोणता?
आंदोलकांच्या अटकेसंदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, आंदोलकांची अटक थांबवावी. बीडमध्ये जे घडले तर ते सत्य आहे आणि आम्ही त्या हिंसेचे कधीही समर्थन केले नाही. पण पोलिसांना जात नसते आणि ती नासायला पाहिजे, तेव्हाच राज्य शांत राहू शकते. पोलीस हे आपले मित्र आहे आणि साथ देणार आहेत, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली पाहिजे.”
मनोज जरांगे पाटील म्हणाले, “माजलगावात पोलीस जातीयवाद निर्माण करत असून माजलगावाचे स्थानिक आमदारांच्या सांगण्यावरून ही कारवाई होत आहे. उद्या मराठ्यांच्या दारात यायचे आहे. हे सगळे सरकार करत नसेल तर त्यांनी हे सर्व थांबवायला हवे. राज्याच्या गृहमंत्र्यापेक्षा पोलीस मोठा असू शकत नाही. आंदोलकांवरील गुन्हे दोन दिवसांत मागे घेतो, असे आश्वासन दिले होते. मला उपोषण सोडून एक महिना झाला तरी देखील सरकारने काही केले नाही म्हणजे हा सरकारने डाव टाकला आहे.”