आज २५ डिसेंबर. शाळेतल्या मुलाला जरी आजच्या दिवसाचे महत्त्व विचारले तर तो म्हणले की आज नाताळ. हो आज नाताळ आहेच. पण भारतातील नाठाळांना जागेवर आणण्यासाठी १९२७ साली एक इतिहास घडला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी विषमतेवर आधारीत समाजव्यवस्था राबवणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले होते. तेव्हापासून हा दिवस “मनुस्मृती दहन दिन” म्हणून साजरा केला जात आहे. मात्र हे कृत्य करत असताना बाबासाहेबांनी जाणीवपूर्वक रायगडची निवड केली होती. त्यामागेही बाबासाहेबांचा काहीतरी उद्देश असणारच. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दल…
महाराष्ट्र ही शिवरायांची भूमी. महाराजांनी स्वराज्याच्या माध्यमातून सुराज्य स्थापन केले होते. ज्यामध्ये जातीभेद, धर्मभेद, लिंगभेद यांना स्थान नव्हते. समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र या सूत्रावर आधारीत महाराजांनी आपले राज्य चालवले. हीच शिकवण महाराष्ट्रातल्या सर्व संतानी आणि बौद्ध धम्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांनी देखील दिलेली आहे. त्याउलट मनुस्मृती ही विषमतेवर आधारीत होती. शुद्र, स्त्रिया यांना मनुस्मृतीनुसार कोणतेही अधिकार देण्यात आलेले नव्हते. त्यामुळेच रायगडच्या पायथ्याशी महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले.
काय सांगते मनुस्मृती
आज मनुस्मृतीचे कायदा आणि त्याचे श्लोक कालबाह्य झाले असले तरी त्यामागे अनेकांचे बलिदान आहे. फुले म्हणायचे की, “जेव्हा मनुस्मृतीने शोषित झालेले लोक शिक्षण घेतील तेव्हा हा ग्रंथ ते नाकारतील”.
भारतातील अनेकांनी मनुस्मृतीचा आपापल्या पद्धतीने विरोध केलेला आहे. मनुस्मृतीच्या आठव्या अध्यायात २९९ वा श्लोक असे सांगतो की –
“ढोर, गंवार, शूद्र और नारी,
ये सब ताडन के अधिकारी”
म्हणजेच शूद्र, अशिक्षित आणि स्त्री हे सर्व शिक्षेस पात्र असल्याचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आढळतो. अशा अन्यायकारी मनुस्मृतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मोठ्या जनसमुदायाच्या समक्ष जाळले. आपल्या लोकांना मानसिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी आणि त्यांच्यात संघर्षाची उमेद जागी करण्यासाठी आंबेडकरांनी हे कृत्य केले होते.