राज्यात १० वी आणि १२ वीच्या परीक्षांच्या निमित्ताने शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विधान परिषदेत महाविकास आघाडी सरकारने तसेच शिक्षण विभागाने घेतलेला एक निर्णय सभागृहाच्या माध्यमातून घोषित केला. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांना आवाहन करत त्यांनी परीक्षा केंद्रांवर १ तास आधी हजर राहण्याची विनंती केली. आतापर्यंत विद्यार्थ्यांना सूट देण्यात येत होती. पण यापुढच्या काळात विद्यार्थ्यांना वेळेत परीक्षा केंद्रावर हजर रहावेच लागेल, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. काही दिवसांपूर्वी विलेपार्ले येथे केमिस्ट्री पेपरच्या निमित्ताने उघडकीस आलेल्या पेपरफुटी प्रकरणावर त्यांनी स्पष्टीकरण दिले.
राज्यात सुरक्षित पद्धतीने परीक्षा व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितले. त्यासाठीच राज्यातील परीक्षा केंद्रांवर पोलीस कर्मचारी वर्ग वाढवला आहे. पोलीस महासंचालकांनी पोलीस कर्मचारी संख्या वाढवून दिल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्हाधिकारी वर्गाकडूनही या परीक्षांसाठी जातीने लक्ष देण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी बोर्डाचे हेल्पलाईन क्रमांकही जाहीर केले असल्याचेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या ठरणाऱ्या अशा परीक्षा सुरक्षित पद्धतीने व्हाव्यात हीच आमची अपेक्षा असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
हेही वाचा : Maharashtra Assembly Budget Session 2022 : आम्ही पुढची ५ वर्ष मोफत वीज देऊ, चंद्रशेखर बावनकुळेंचं आवाहन