मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. पण यामधील ८० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्णांमध्ये लक्षणे नसून कमी प्रमाणात रुग्ण रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आज मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी सध्याची मुंबईतील परिस्थिती पाहता लॉकडाऊनची गरज नसल्याचे स्पष्ट केले. मुंबईत आज सलग दुसऱ्या दिवशी दैनंदिन रुग्णांची संख्या २० हजार पार गेली आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत २० हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली असून ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ८ हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच आज दिवसभरात धारावीत १५० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सध्या धारावीत ५५८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
COVID-19 | Mumbai reports 20,971 new cases, 6 deaths and 8,490 recoveries today. Active cases 91,731 pic.twitter.com/ZpBJKFum9m
— ANI (@ANI) January 7, 2022
मुंबईत आज आढळलेल्या २० हजार ९७१ रुग्णांपैकी १७ हजार ६१६ रुग्ण लक्षणेविरहित आहेत. मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ७४ हजार ७८०वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३९४ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ६४ हजार ५३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या मुंबईत ९१ हजार ७३१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात मुंबईत ७२ हजार ४४२ रुग्णांच्या कोरोना चाचण्या झाल्या असून आतापर्यंत १ कोटी ४० लाख ६४ हजार ५३७ चाचण्या झाल्या आहेत. आज आढळलेल्या रुग्णांपैकी १ हजार ३९५ रुग्ण रुग्णालयात दाखल झाले आहे. तसेच ८८ रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासली आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ऑक्सिजनचा वापर नगण्य असल्यामुळे मुंबईत लॉकडाऊन केला जाणार नाही, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी स्पष्ट केले आहे. मुंबईतील रिकव्हरी रेट ८७ टक्के असून दुप्पटीचा दर ५६ दिवस आहे.
हेही वाचा – Mumbai Lockdown: …म्हणून मुंबईत लॉकडाऊनची गरज नाही; पालिका आयुक्तांचं दिलासादायक वक्तव्य