शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाषणाच्या सुरुवातीलाच संजय राऊतांच्या अटकेवरून उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघणा केला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर देखील उद्धव ठाकरेंनी टीकास्त्र डागले आहे. मुंबईवर संकट येतात त्यावेळी ही लोकं कुठे असतात? आपल्याला जमीन दाखवणाऱ्यांना अस्मान दाखवायचंय, असा शब्दात उद्धव ठाकरेंनी भाजपला आव्हान दिले आहे. ठाकरेंच्या टीकेला आता भाजप मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना प्रत्युत्तर दिले आहे. आशिष शेलार यांनी सलग ट्विट करत ठाकरेंवर प्रश्नांचा भडिमार केला आहे.
26 जुलैच्या पुरात मुंबईकरच मुंबईकरांसाठी झटत होते, हे खरे आहे. पण आज त्या दाहक आठवणींचे भाषण करणारे 26 जुलैच्या पुरात आपल्या वडिलांना मातोश्रीत सोडून स्वत: पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन बसले होते.. त्याचे काय? असा पहिला सवाल आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
26/11 च्या हल्ल्यात पण मुंबईकर मुंबईकरांसाठी जातपात, पक्ष न बघता मदत करत होते. नरिमन हाऊस, ताज या परिसरात आमचा कमलाकर दळवीसुद्धा मदत करत होता. आज भाषण करणारे मातोश्रीच्या बाहेर आले होते का? असा दुसरा सवाल शेलारांनी केला.
मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय?
अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे… भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
बॅण्ड स्टँडच्या समुद्रात मुली वाहून जात असताना स्वतःचा जीव धोक्यात घालून मुलींना वाचविताना दुर्दैवी मृत्यू झालेला रमेश वाळूंज हा कार्यकर्ता भाजपाचा होता. जेव्हा त्याने केलेले धाडस चर्चेत आले तेव्हा हा आमचा कार्यकर्ता आहे असे सांगत हे घरी पोहचले. असा दावाही शेलारांनी केला आहे.
मुंबईकरांना बदल हवाय…
मुंबईकरांचं ठरलंय!
म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!!
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 21, 2022
कोरोनामध्ये देवेंद्र फडणवीस आणि मा. एकनाथ शिंदे पीपीई घालून रुग्णालयात जाऊन रुग्णांना धीर देत होते… तेव्हा तुम्ही घरी बसला होतात…स्थलांतरीत मजूरांना अन्नधान्य वाटपापासून गरिबांना भाज्या, धान्य वाटणारे शेकडो भाजपाचे कार्यकर्ते तुम्हाला कसे दिसणार? तुम्ही घरी बसलात होतात!, असा टोलाही शेलारांनी लगावला आहे.
मुंबईचा ताळेबंद मांडायचा झाला तर बरेच मुद्दे मांडता येतील आणि महापालिकेचा ताळेबंद मांडायचा तर सत्ताधीशांच्या भ्रष्टाचाराचे पारडे जड ठरेल. हिशेब होणारच आहेत सगळ्याचे… ते आम्ही नाही मुंबईकर करणार आहेत. मुंबई जिंकायला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह येणार म्हणून तुम्ही ठरवलंत आणि तुम्ही आधीच घाबरून गेलात की काय? अहो, यावेळी मुंबई ही मुंबईकरांना जिंकायची आहे… भाजपा मुंबईकरांसाठी लढणार आहे! असंही शेलार म्हणाले.
मुंबईकरांना बदल हवाय… मुंबईकरांचं ठरलंय! म्हणून काही जणांचं पित्त खवळलंय!! असही आशिष शेलार म्हणाले.