महाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावेळी राज्य सरकार सर्व प्रकल्पांची श्वेत पत्रिका काढणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून केली.
वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस, सॅफ्रन, सिनारमस या प्रकल्पांची खरी वस्तूस्थिती महाराष्ट्रासमोर आणण्यासाठी आम्ही येत्या महिन्याभरात या सर्व प्रकल्पांची श्वेतपत्रिका जाहीर करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्र शासनानं उद्योगांबाबत केलेला पत्रव्यवहार, दाओसमधील झालेल्या बैठका असतील. तसेच या बैठका झाल्यानंतर या रेकॉर्डचा पुरावा MIDC आणि उद्योग विभागाकडे किती आहे, याचा पुरावा आम्ही महाराष्ट्राला आणि युवा पिढीला देणार आहोत, असं उदय सामंत म्हणाले.
काल सॅफ्रन प्रोजेक्टबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम निर्माण करण्याचा प्रकार घडला. हा प्रयत्न काय आहे की, मीडियानं दीड दोन महिन्यापूर्वी ज्या प्रसिद्ध झालेल्या बातम्या होत्या त्या खोडण्याचं काम तसेच संबंधीत कंपनी गेल्याचं सांगून त्याचं खापर आमच्यावर फोडण्याचं काम काही लोक करत आहेत, असं उदय सामंत म्हणाले.
पूर्वी आणलेले प्रकल्प हे आम्ही आणल्याचं सांगितलं जात आहे. परंतु याबाबत मी असं कधीही वक्तव्य केलेलं नाही. उलट मी असं सांगितलं गाजावाजा करत जे MOU झाले त्यांची अमंलबजावणी का झाली नाही. कॅबिनेट सब कमिटीची मीटिंग 14 महिने का झाली नाही, याचं उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला आणि मलाही मिळालेलं नाही, असं म्हणत उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.