नवी दिल्लीः आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे खासदार संजय राऊतांवर निशाणा साधलाय. एकनाथ शिंदेंनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतलीय, त्यावेळी ते बोलत होते.
ईडीच्या कारवाईबाबतीत आमचे गटनेते बोलतील, पण मी सांगतो आणखी कोणी बोललं असतं तर दखल घेण्यासारखं होतं. पण सकाळी जो मॅटिनी शो असायचा पूर्वीचा तो बंद झाला आहे. मला त्यावर बोलण्याची आवश्यकता वाटत नाही. कारण ते दखल घेण्यासारखं नाही. तुम्हालाही माहीत आहे, पण तुम्हाला रोज काही ना काही बातम्या हव्या असतात, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
त्यांचं मॅटर जे होतं ते कोर्टात आहे. कोर्टानं त्या बाबतीत त्यांच्या बाजूनं निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आमच्या सरकारनं त्यांना कुठलीही क्लीन चिट दिलेली नाही. खासदार 20 ते 22 लाख मतांमधून निवडून आलेले आहेत. एक ग्रामपंचायत सदस्य आणि नगरसेवकही इकडे तिकडे जाताना खूप विचार करतो. आज याचा विचार करण्याची आवश्यकता आहे, असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना लगावलाय.
जी भूमिका 50 आमदारांनी घेतली त्या भूमिकेचं समर्थन राज्यभरातून सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी केलेलेच आहे. परंतु महाराष्ट्रातील जनतेनंही त्याचं समर्थन केलेलं आहे. 2019 ला शिवसेना-भाजप युतीत निवडणूक एकत्र लढलो होतो, गेल्या महिन्याभरात आम्ही तो निर्णय घेतला. जे अडीच वर्षांपूर्वी व्हायला पाहिजे होतं, ते आता झालं आहे. आम्ही जनतेच्या मनातील सरकार स्थापन केलं, त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसादही मिळतोय. आम्ही सगळे निर्णय तातडीनं घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनीसुद्धा पूर्ण पाठिंबा महाराष्ट्र सरकारला दिलाय. राज्याच्या विकासाला कुठेही काही कमी पडू दिलं जाणार नाही, असं आश्वासन पंतप्रधानांनी दिलंय. त्यामुळे पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे आभार मानतो, असंही एकनाथ शिंदे म्हणालेत.
हेही वाचाः शिवसेनेच्या 12 खासदारांनी स्वतंत्र गट तयार करून पत्र दिलं, एकनाथ शिंदेंची माहिती