मुंबई : अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी षडयंत्र रचले गेले होते. निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्र येण्याचे ठरले होते. फक्त त्यांना ‘नंबर गेम’ची प्रतीक्षा होती, असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला.
पनवेल येथे प्रदेश भाजपा कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत मार्गदर्शन करताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शिवसेनेचा समाचार घेतला. राष्ट्रवादीचे आणि शिवसेनेचे आधीच ठरले होत. त्यामुळे निकाल लागल्यानंतर त्यांनी, ‘आम्हाला सर्व मार्ग खुले आहेत,’ असे वक्तव्य केले होते. तरीही, मी फोन करत होतो; मात्र, ते फोन घेत नव्हते, अशी त्यावेळची वस्तुस्थिती फडणवीसांनी मांडली.
हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर बाबासाहेब पुरंदरेंनी अन्याय केला; शरद पवारांचा आरोप
शिवसेनेने आमच्याशी बेईमानीच केली. युतीच्या काळात आपण शिवसेनेविरोधातील बंडखोर उमेदवार मागे घेतले. पण आमच्या जागा पाडण्यात आल्या, असा आरोप फडणवीस यांनी केला. लोकांनी युतीला जनमत दिले असतानाही त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून सत्ता स्थापन केली. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचाराच्या विपरित अशी शिवसेनेने भूमिका घेतली. तशी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेकडे आता अल्प आमदार आहेत. आपल्यासोबत आहे ती खरी शिवसेना आहे, जी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारी शिवसेना आहे, असे ते म्हणाले.
सत्ता ही मॅग्नेट प्रमाणे असते. ती लोकांना एकत्र ठेवते. पण तब्बल नऊ मंत्र्यांसह ५० आमदार सरकार सोडून तत्कालीन विरोधकांकडे आले. पुढच्या निवडणुकीत आपण काही दिसणार नाही, हे त्यांच्या लक्षात आले. याच खऱ्या शिवसेनेबरोबर सत्ता स्थापन केली आहे. जनमताची चोरी झाली होती, ती पुन्हा एकत्र आणली, असे सांगून ते म्हणाले की, सत्तेचा गड जिंकलो आहे. पण सत्ता हे साध्य नाही, साधन आहे. सामाजिक तसेच आर्थिक परिवर्तनाचे उपकरण म्हणून सत्तेकडे पाहतो. भाजपा सत्तापिपासू नाही, हे सत्तेसाठी केलेलं परिवर्तन नाही. विकासात महाराष्ट्र मागे पडला आहे, त्याला आचा पहिल्या क्रमांकावर आणायचे आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा – राज्याच्या कानाकोपऱ्यातून म्याव-म्याव आवाज येतोय; नितेश राणेंचा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंना टोला