Manipur : मणिपूरमधील दोन महिलांसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यानंतर देशभरातून संतापाची लाट उसळली आहे. या व्हिडीओमध्ये दोन महिलांना विवस्र करुन त्यांची धिंड काढल्याचे दिसत आहे. यानंतर सोशल मीडियावर मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. तसेच राजकीय नेते, कलाकार आणि देशभरातील लोकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ट्विटरच्या माध्यमातून भीती व्यक्त केली आहे. (Manipur : Act now, or else…; Raj Thackeray fears ‘this’ in case of Manipur viral video)
हेही वाचा – Manipur Violence: मणिपूरमधील दोन महिलांच्या विवस्र व्हिडीओप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक
राज ठाकरे म्हणाले की, कालपासून मणिपूरमधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की, आता तरी या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित होईल हे पहा. पण परिस्थिती ‘जैसे थे’ आहे आणि हेच दुर्दैव आहे, अशी खंत राज ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवली.
कालपासून मणिपूर मधली समाजमाध्यमांवर जी दृश्य समोर आली आहेत ती हादरवणारी आहेत, आणि दोन्ही सरकारांना लाज वाटायला लावणारी आहेत. मी काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान महोदयांना आणि गृहमंत्र्यांना पत्र लिहून विनंती केली होती की आता तरी ह्या विषयात लक्ष घालून मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 20, 2023
राज ठाकरे म्हणाले की, या प्रकरणातील जे गुन्हेगार आहेत त्यांना फाशीचीच शिक्षा व्हायला हवी. पण त्याचवेळेस जर केंद्रसरकारकडून ठोस कृती होणार नसेल तर, आता राष्ट्रपतींनी यात लक्ष घालायला हवं. मणिपूरमध्ये गेल्या 3 महिन्यात जे घडलं, त्याने फक्त मणिपूरच नाही, तर संपूर्ण भारताच्या समाजमनावर ओरखडा उमटला आहे आणि यातून काही वर्षांनी एखादं आक्रीत घडलं तर त्याला मात्र सध्याचंच सरकार जबाबदार असेल. पंतप्रधानांनी आत्ता जरी या घटनेचा निषेध केला असला तरी तो पुरेसा नाही. आता कृती करा, अन्यथा ईशान्य भारत कायमचा भारतापासून तुटेल, अशी भीती राज ठाकरे यांना वाटत आहे.
हेही वाचा – Manipur Violence: ‘त्या’ अत्याचाऱ्यांवर तातडीने कारवाई करा अन्यथा आम्ही करू, सरन्यायाधीशांचा सरकारला इशारा
राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक
मणिपूर व्हायरल व्हिडीओ प्रकरणी आता राष्ट्रीय महिला आयोग आक्रमक झाले आहे. त्यांनी राज्य पोलिसांना या प्रकरणी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी असे म्हटले की, मणिपूरची घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. यासंदर्भात आम्ही डीजीपी, सीएस आणि मणिपूर प्रशासनासोबत बातचीत केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्या आरोपीचा रिपोर्ट 24 तासात मागवला आहे. त्याचसोबत आम्ही ट्विटरलाही नोटीस धाडली आहे. कारण त्यांनी अशा प्रकारचा एका महिलेचा विवस्र व्हिडिओ प्रसारित केल्याने ब्लॉक का केला नाही असाही प्रश्न उपस्थितीत केला आहे.
हेही वाचा – Manipur Violence: मणिपूर घटनेप्रकरणी विरोधी पक्षाकडून मोदी सरकारवर टीका